'मारकडवाडी'त राजकारण नको : हेमंत पाटील

प्रशासनाने जनमताचा आदर करणे आवश्यक

by Team Satara Today | published on : 10 December 2024


मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात 'ईव्हीएम' वर होणाऱ्या मत प्रक्रियेवर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.राज्यात विविध भागात ईव्हीएम ऐवजी 'मतपत्रिके'वर मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी केली जात आहे.जनमानसातील संभ्रम दूर करण्यासाठी राज्य सरकारने पर्यायाने प्रशासनाने त्यामुळे योग्य पावले उचलावीत,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.९) केली. सोलापूरातील मारकडवाडी प्रकरणात राजकारण न करण्याचे आवाहन पाटील यांनी विरोधी पक्षांना केले आहे.मारकडवाडीतील ग्रामस्थांच्या मताचा आदर करीत प्रशासनाने त्यांच्या शंकांचे निकारण करण्यासाठी दबावतंत्राचा वापर न करता सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन पाटील यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनाच धक्का देणारे आहेत.विविध मतदार संघातील पराभूत उमेदवारांनी अर्ज करीत ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला आहे.विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. मारकडवाडीत यामुळे बॅलेट पेपर वर मतदार प्रक्रिया घेण्याच्या मागणीवर प्रशासनाला लवकरात लवकर तोडगा काढावा लागेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.एकट्या पुण्यातील २१ मतदार संघातील ११ उमेदवारांनी मायक्रोकंट्रोलर पुन्हा तपासणीसाठी आयोगाकडे अर्ज केला आहे.निवडणूक प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार झाला नसल्याने पुन्हा तपासणी तसेच मारकडवाडीत बॅलेट पेपर प्रकिया राबवण्यास काय हरकत आहे? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.अभूतपूर्व विजयानंतर मुख्यमंत्रीपद स्वीकारणारे देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हातळत मारकडवाडीतील जनमताची भावना समजून घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जेष्ट नेते शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात देश आणि राज्य पातळीवर कायदेशीर लढाई लढण्याचे स्पष्ट केले आहे. पवारांनी देखील याप्रकरणावर योग्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी पाटील यांनी केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात ऊस दर प्रश्नबाबत रयत क्रांती संघटना आक्रमक
पुढील बातमी
कुर्ला येथे भीषण बस अपघात

संबंधित बातम्या