सातारा : येथील प्रसिध्द निवेदिका स्नेहल दामले यांना पुण्यातील रंगत संगत प्रतिष्ठानचा उध्दव कानडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार, दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील पत्रकार भवनात होणार्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ कवी, लेखक, निवेदक उध्दव कानडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असून यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ कवी डॉ. संगीता बर्वे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका शिल्पा देशपांडे करणार असून यावेळी अजंली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन होणार आहे. या पुरस्काराबद्दल स्नेहल दामले यांचे सातार्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
सातार्यातून पुण्यात येऊन आवडीचे काम करत राहिले. चांगली माणसे, चांगले कलाकार, चांगल्या संस्था मिळत गेल्या. रसिकांचे प्रेम मिळते आहेच. घरचे अखंड पाठीशी आहेत. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेते आहे, त्याचे कौतुक करते आहे, पुरस्कार देऊन त्यावर शाबासकीची मोहोर उमटवत आहे, हे सारं खूप सुखावणारं आणि उर्जा देणारं आहे, अशी प्रतिक्रिया स्नेहल दामले यांनी याबाबत व्यक्त केली.