सातारा : शेत ओलितासाठी पदरमोड करुन शेतकर्याने शेतात विहीर खोदली. अनामत रक्कम भरुन वीज पुरवठाही घेतला. मात्र, कृषीपंपाला पुरेसा वीजपुरवठा नसल्याने रब्बी हंगामातील पिके वाळू लागली आहेत. यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
महावितरणकडून शेतकर्यांसाठी विविध योजना आहेत. पण, या सर्व योजनांपेक्षाही कृषीपंपाला पुरेसा वीज पुरवठा मिळाला तरी पुरेसे आहे, अशी शेतकर्यांची माफक मागणी आहे. महावितरणकडे अनामत रक्कम भरुन वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करुन मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला पुरेसा वीजपुरवठाच रहात नसल्याने पाण्याची सोय असताना पिकांना पाणी मिळत नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, असे शेतकरी सांगत आहेत. त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणार्या शेतकर्यांवर कारवाई करत विजेची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, त्यानंतरही समस्या कायम आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या आहे. नवे रोहित्र बसवण्यात आले असतानाही एका रोहित्रावर अनेक मोटारपंपांच्या वीज जोडण्या असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करत असल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत उच्च दाबाने वीजपुरवठा करून समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यामुळे विहिरीत पाणी असूनही रब्बी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिके वाळत आहेत. मोटर चालू केली की लगेच बंद पडते. सर्व गोष्टींची महाविरतणच्या अधिकार्यांनी तपासणी करुन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.