बांगलादेश सरकारचा हिंदू धर्माविरोधातील कारवाया सुरु आहेत. आता इस्कॉन या हिंदू संघटनेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. बांगलादेश सरकारने इस्कॉनला धार्मिक कट्टरतावादी संघटना म्हणून संबोधत. या संघटनेची चौकशी सुरू असल्याचे आज (दि.२७) सांगितले. दरम्यान, सनातनी जागरण जोत या हिंदू संघटनेचे प्रवक्ता चिन्मय प्रभू यांना बांगला देशातील मोहम्मद युनूस सरकारने देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली. या कारवाईविरोधात बांगलादेशात निदर्शने सुरू आहेत.
बांगलादेशात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यासह १९ जणांवर देशद्रोह कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी सनातन जागरण मंचने चितगाव येथील लालदिघी मैदानावर आठ कलमी मागण्या घेऊन रॅली काढल्याचा आरोप आहे. यावेळी चौकात असलेल्या आझादी स्तंभावर काही लोकांनी भगवा ध्वज फडकावला होता. या ध्वजावर आमी सनातनी असे लिहिले होते. याबाबत चिन्मय कृष्ण दास यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान आणि अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इस्कॉनने निवेदनात म्हटले आहे की, "चिन्मय कृष्ण दास प्रभू हे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी बोलतात. सरकारनेही नागरिकांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे. बांगलादेश हे आपले जन्मस्थान आणि आपल्या पूर्वजांचे घर आहे. बांगलादेशचे नागरिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, जिथे आमचे अनेक आचार्य आणि संत जन्मले. नागरिक म्हणून, आम्हाला बांगलादेशच्या वर्तमान आणि भविष्यातील सरकारांसोबत शांततापूर्ण सहकार्याने राहायचे आहे, परंतु आम्ही मागणी करतो की सरकारने न्याय सुनिश्चित केला पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म आणि परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य असावे".
चिन्मय कृष्ण दास यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील अल्पसंख्याकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर न्यायालयाने चिन्मय कृष्ण दासचा जामीन अर्जही फेटाळला आणि त्याची रवानगी तुरुंगात केली. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.