सातारा : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उभे न राहता सामाजिक कार्याचे नेतृत्व करून इतरही सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचा आनंद मला घ्यायचा आहे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते व श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी जाहीर केली.
श्री. चोरगे नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होती. त्याअनुषंगाने त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. कोणतीही सत्ता, पद नसताना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुकुल स्कूल, सवयभानच्या माध्यमातून आणि सातारकरांच्या सहकार्यातून माझ्याकडून अनेक समाजोपयोगी कामे झाली. खर तर मी निमित्त आहे, असे नमूद करून चोरगे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारच्या विकासासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने अगर व्यक्तीने, संघटनेने मला चांगल्या कामासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन मागितले तर मी नक्कीच द्यायला कायम कटिबद्ध राहीन.
नगरपालिका निवडणूक आणि नगराध्यक्षपद यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना शिंदे या दोन्ही पक्षांनीन विचारणा केली होती. तसेच अनेक संघटना आणि व्यक्तींनी नगराध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी आग्रह केला. सर्व पक्ष, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण व माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी मला सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी योग्यतेचे समजले यातच माझा विजय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व महत्वाचे असते. राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी बरेच लोक इच्छुक आहेत. पण सामाजिक कार्यात नेतृत्व करण्यासाठी पुढे कोणी येत नाही. गुरुकुल स्कूलची भावी पिढी विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडवण्याची जबाबदारी तसेच संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी प्रकल्पाची देखभाल आणि तेथील सेवकांची जबाबदारी मला महत्वाची वाटते.
संघर्षाच्या काळात धाडसाने बरोबर राहिले अशा मित्र व सहकाऱ्यांसाठी सुध्दा काही चांगले करायचे माझे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.