वाई :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अविनाश मोहन पिसाळ (रा. बावधन, ता. वाई) यास पुढील दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
अविनाश पिसाळ याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, धमकावणे असे गंभीर चार गुन्हे वाई पोलीस ठाण्यात नोंद आहेत. त्याच्यावरील हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव वाईच्या उपविभागीय दंडाधिकार्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करून, उपविभागीय दंडाधिकार्यांनी अविनाश पिसाळ याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1)(अ) आणि (ब) नुसार हद्दपारीची कारवाई केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार अमित सपकाळ आणि नितीन कदम यांनी या कारवाईत योगदान दिले.