अभिनेत्री शुभांगी गोखले या मराठी कलाविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांना मनोरंजन जगतात एक वेगळा ठसा उमटवला आहे. शुभांगी गोखले यांचा वेगळा चाहतावर्ग आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये शुभांगी गोखले यांनी भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले त्यांच्या अभिनयासह परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. नुकतीच त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शुभांगी गोखले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर वारीत जाऊन भक्तिमय वातावरणाचा विचका करणाऱ्या आणि निसर्गाची लय बुघडवून टाकणाऱ्या लोकांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, "खूप वर्षांपासून मनात येत रहातं. वारी वर्षानुवर्षं शांतपणे,शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडी ची पाकिटं ने केळी वाटायची, मेकप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीनी घुसून भाक-या भाजायच्या. असे अनेक प्रकार करून क्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा, कशासाठी?"
त्यानंतर पुढे त्यांनी लिहिलंय, "काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा मिलनाचा काळ. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तीला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत, टॉर्चेस चा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा. खूप लिहायचंय, पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी! पांडुरंगा.. सांभाळ रे...!" अशा आशयाची पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शुभांगी गोखलेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'काहे दिया परदेस', 'हम है ना', 'डॅडी समझा करो', 'लापतागंज', 'राजा राणीची गं जोडी',' झेंडा', 'क्षणभर विश्रांती' , 'बोक्या सातबंडे' अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला.