मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट भाजपवर हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले की, “भाजप हा पक्ष मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे. आम्ही हे फक्त अजित पवारांचं निधन आणि राष्ट्रवादीमध्ये जे सुरु आहे त्यावरुन बोलत नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही भाजपने अशी खेळी केली आहे. भाजपला दुखवटा याच्याशी काहीही संबंध नाही. अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य होते. आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण मी आता बोलणार नाही. अजित पवारांच्या निधनाचा दुखवटा संपल्यावर मी भाष्य करेन,” असे ते म्हणाले.
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले, “या सगळ्यावर मी आता भाष्य करणार नाही. पण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. दुर्दैवी पद्धतीने उपमुख्यमंत्रीपद रिकामे झाले असून, याबाबत काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा पक्ष निर्णय घेईल.” “आता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणतात की, मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही. अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट असल्याने शरद पवार बोलतात ते योग्यच आहे. कोणालाच त्या विषयाची माहिती नाही, तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
अमित शाह निर्णय घेतील; खोचक टोला
“अजित पवार गेल्याचे दुःख घराघरात आहे. आमच्या घरात देखील दुःख आहे. अजित पवार घरा-घरातला चेहरा होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण हे कौटुंबिक राजकारण आहे. त्याचा पक्ष निर्णय घेईल. फार फार तर अमित शाह निर्णय घेतील. याविषयी आमची भूमिका कशाला? अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे ते ठरवतील. बाळासाहेब गेल्यावर शिवसेनाही यांना नेतृत्वहीन वाटत होती, पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची ती योजना उधळून लावली,” असेही ते म्हणाले.