दि.7 ते दि.9 जानेवारी दरम्यान श्री शतचंडी यागाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 28 December 2024


सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ ही संस्था सध्या आपला अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता संस्थेच्या वतीने सातारा येथील राजवाडा परिसरातील श्री समर्थ सदन सांस्कृतीक केंद्र येथे श्री शतचंडी यागाचे आयोजनाने होत आहे.

अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त हा भव्य शतचंडी याग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 ते गुरुवार दि. 9 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी दिली.

या  कार्यक्रमामध्ये मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या सत्रात सकाळी आठ ते नऊ या वेळेत प्रायश्चित्त ,प्रधान संकल्प ,पुण्याहवाचन होऊन सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत उत्सव मूर्ती प्रतिष्ठापना तसेच  देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन केले जाणार आहे. सायंकाळच्या सत्रात दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत सार्वजनिक कुंकुमार्चन सोहळा देवीला होणार आहे. ज्या भाविकांना या कुंकुमार्चन सेवेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी समर्थ सदन सातारा येथे सहा जानेवारी पूर्वी संपर्क साधावा. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण संदीप बुवा मांडके यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. मांडके यांचे हे कीर्तन सलग दोन दिवस दि.सात जानेवारी व दि.8 जानेवारी रोजी होणार आहे.

बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते साडेबारा या वेळेत सप्तशती पाठ याचे सामुदायिक वाचन केले जाणार असून त्यानंतर दुपारी चार ते साडेपाच या वेळेत रामकृष्ण पाठशाळेचे वतीने महिला वर्गात कडून विविध देवी स्तोत्रांचे पठण होणार आहे. सौ.संगिता देशपांडे व त्यांच्या सहकारी भगिनी या स्तोत्राचे पठण करणार आहेत.

गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत श्री  शतचंडी यागाचे उत्तरांग पूजन, बलिदान सोहळा, स्नान, यागाची  पूर्णाहुती,  दक्षिणाप्रदान, यजमानांना आशीर्वाद व सांगता होणार आहे. सकाळी साडेअकरा ते या 12 या वेळेत वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडबोले यांचे समारोपाचे आशीर्वादपर प्रवचन होणार असून या  शतचंडी   यागाचे आयोजनामध्ये वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणचे ब्रह्मवृंद सहभागी होऊन हा याग संपन्न करणार आहेत.

समस्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच देवी भक्तांनी या  शतचंडी   यागाच्या सोहळ्यात तन-मन-धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले व कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयआयटी बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज
पुढील बातमी
सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार

संबंधित बातम्या