सातारा : लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कमालीचा श्रेयवाद सुरू आहे. राज्याची वित्तीय तूट दोन लाख तीस हजार कोटी इतकी प्रचंड आहे, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करून राज्य शासन धडाधड वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे. राज्यात महिला अत्याचार वाढलेले असताना लाडक्या बहिणींच्या योजनेचे कौतुक केले जात आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर शाहू कला मंदिर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर सरकार शरण आल्यासारखे करत आहे. त्यांच्याकडून काही हवं असेल तर हीच वेळ आहे फक्त घोषणा मिळतील. प्रत्यक्षात काम मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेवरून तिन्ही घटक पक्षांमध्ये जोरदार श्रेयवाद सुरू आहे, नक्की योजना कुणाची यावरून मतमतांतरे सुरू असून, जो-तो आपापल्या पद्धतीने घोषणा करत आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दोन लाख तीस हजार कोटी रुपयांचा प्रचंड बोजा आहे. घोषणा व दिलेली कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सर्व फाइल्स वर महसूल व वित्त विभाग निधी नसल्याचे लिहीत आहे. तरीही अर्थमंत्र्यांचे न ऐकता उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून, मुख्यमंत्री धडाधड योजना जाहीर करत आहेत. परंतु बाणेदारपणा दाखवण्याऐवजी दोन्ही उपमुख्यमंत्री खुर्ची लाडकी असल्याने सोडायला तयार नसल्याची टीका पाटील यांनी केली.
दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी आभार मानले, राष्ट्रवादीचे बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.