महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे पुन्हा प्रशासनाला निवेदन

प्रशासनाच्या विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दिला निर्वाळा

by Team Satara Today | published on : 12 August 2024


सातारा : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ हा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात नाही. संघटनेच्या नावाखाली काहीजण प्रशासनावर दबाव टाकत आहेत. यामध्ये दिलीप कुर्‍हाडे हे गेले पंधरा ते वीस वर्षे या व्यवसायात आहेत. त्यांनी कधीही वडार समाजातील गरीब घटकांना बरोबर व्यवसाय केला नाही. केवळ वैयक्तिक विचार केला आहे. मौजे नागेवाडी सर्वे नंबर 308 येथे गेले वीस वर्ष व्यवसाय करत आहेत. त्यांनी खाण नंबर आठ घेतली आहे. समाजातील लोकांना पारंपारिक व्यवसायासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी राखीव ठेवलेल्या पाच खाणी समाजाला मिळू नये, यासाठी हायकोर्टात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सदर व्यक्ती कायम खोटे बोलून अधिकार्‍यांवर दबाव आणत असून सगळ्यांची बदनामी करत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रामचंद्र नलावडे यांनी केला.
यावेळी माजी नगरसेवक रवी माने उपस्थित होते. याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. कुर्‍हाडे यांच्या मागे वडार समाजातील पाच टक्के सुद्धा लोक नाहीत. त्यांनी समाजाच्या नावाने कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत. वडार संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एकूण पाच खाण प्लॉट मिळाले, पण त्याचे श्रेय कुर्‍हाडे घेतात. समाजाला अंधारात ठेवून दोन प्लॉट लिलावात काढायला सांगतात. प्रशासनाने एकूण पाच प्लॉट म्हणजे बारा हेक्टर राखीव जागा ठेवली असताना त्याचा उपभोग आम्हाला घेता आलेला नाही. त्याचे मूळ कारण कुर्‍हाडे हेच आहेत. समाजाच्या प्रत्येक कामासाठी आम्ही प्रयत्न करीत असून सर्व कामांमध्ये हीच व्यक्ती सातत्याने अडथळा आणत आहे. प्रशासनावर दबावतंत्र वापरून ते स्वतःचा फायदा करून घेतात. 
सध्या प्लॉट नंबर 15 मध्ये वडार समाजाला परवाना देण्यात आला आहे. त्याचे 25 सभासद आहेत. 25 सभासदांचा रोजीरोटीचा प्रश्न कलेक्टर साहेबांनी सोडवला आहे. त्याच प्लॉटवर कुर्‍हाडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यवसायासाठी परवाना मागितला होता. जिल्हाधिकार्‍यांनी सोसायटीमधील 25 सभासदांचा विचार करून परवाना दिला आहे. त्यांच्या विरोधात कुर्‍हाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु हा दावा निकाली काढण्यात आलेला आहे. शासनाने आतापर्यंत वडार समाजाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. आमच्या समाजाची अधिकार्‍यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही, असा स्पष्ट निर्वाळा रामचंद्र नलावडे यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पृथ्वीराज चव्हाण यांना शह देण्यासाठी जेपी नड्डा येणार कराडमध्ये
पुढील बातमी
बालकामगार ठेवणारी कंपनी बंद करा : गायकवाड

संबंधित बातम्या