शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

by Team Satara Today | published on : 03 May 2025


शिर्डी  : जगप्रसिद्ध शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ही धमकी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आल्याने, याला विशेष गांभीर्याने घेतले जात आहे. यापूर्वीही साईबाबा संस्थानला वेगवेगळ्या स्वरूपातील धमकीचे मेल्स आणि पत्रे मिळाली होती, मात्र यावेळी देशातील सुरक्षेचा विषय अधिक तीव्र झाल्यामुळे प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता कडेकोट उपाययोजना केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी शिर्डी देवस्थानच्या प्रशासनाला या धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये आणखी काय आहे, याबाबत अजून काही खुलासा झालेला नाही.सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीदेखील या मेलविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. साई संस्थानला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील धमकीचे मेल आले आहेत. पण तपासाअंती हे मेल बनावट असल्याचे आढळून आले होते. पण जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी (Terrorist) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात आधीच संतापाची लाट असताना,शिर्डीतील साईसंस्थान मंदिरालाही बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेलमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमकीच्या मेलमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, हा मेल खरचं धमकीचा आहे की, कोणी खोडसाळपणा केला, याचा तपास पोलिस घेत आहे.

दरम्यान, कालच (३ मे) केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनीही साईसमाधीचं दर्शन घेऊन ते . त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं काय प्रत्युत्तर असेल, यावर ‘आता फक्त ॲक्शन पाहा…ॲक्शन!’, असे सूचक विधान केले होते. पण मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राहाता इथल्या गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाचा प्रारंभ झाला. त्यावेळी त्यांनी सत्कार देखील नाकारला. जोपर्यंत पहलगाम घटनेचा बदला घेतला जाणार नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नसल्याचा संकल्प असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) इथं सहा मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बैठक पहिल्यांदाच ग्रामीण भागात होत आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तिथं गुंतली आहे. यातच शिर्डी साईसंस्थानला मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वनसदृश्य परिस्थितीबाबत खा. उदयनराजे भोसले यांची परखड प्रतिक्रीया
पुढील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित

संबंधित बातम्या