पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही महायुतीच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी झाली. महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दारुण पराभव झाला. अनेक मातब्बर राजकारणीं यंदाच्या निवडणुकीनंतर घरी बसले आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी आणि असंतोष वाढू लागला आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे नेते व खासदार अमोल कोल्हे यांनी टोला लगावला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी राजकीय टिप्पणी केली आहे. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाविकास आघाडीच्या इतर पक्षांना टोला लगावला आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सल्ला दिला आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले,”विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे,” असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
मात्र खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना मित्रपक्षांना मात्र खडेबोल सुनावले आहेत. त्यांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षातील नेते आपण एकला चलो रेची भूमिका घ्यावी, अशी विनंती करत असल्याची माहिती मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपल्याला फटका बसलेला आहे, असे मत उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून देखील व्यक्त केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक वाय.बी . चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे. शरद पवार , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये मोठा पराभवाचा धक्का बसल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पण खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.