महू-हातगेघर धरण अपूर्ण ठेवण्याचे पाप कोणी केले?

अमितदादा कदम यांची महू येथील सभेमध्ये टीका

by Team Satara Today | published on : 03 November 2024


सातारा : जावली तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले महू-हातगेघर 25 वर्षांपूर्वी 90 टक्के पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर उरलेले काम सत्ताधार्‍यांना दिसले नाही का ? विकास म्हणजे ठेकेदारांच्या सोयीची कामे म्हणजे विकास नाही, अशी जळजळीत टीका अमितदादा कदम यांनी महू येथील सभेमध्ये केली. धरण पूर्ण झाले तर 1300 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या शेतकर्‍यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला निश्चित मतदान करा, असे कळकळीच आवाहन महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी केले.

महू येथील काळभैरवनाथाच्या मंदिराच्या सभा मंडपात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, जावली तालुकाप्रमुख नितीन गोळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष सुरेश गोळे, जावली संघटक रवी चिकणे, युवा सेना तालुकाप्रमुख जीवन शिंदे, उप तालुकाप्रमुख रवी पार्टे, शिवआरोग्य सेनाप्रमुख प्रकाश गोळे, उमेश दुर्गावळे इत्यादी उपस्थित होते.

अमितदादा पुढे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही संघटना राजकीय पक्षांमध्ये भांडण लावून ते फोडण्याचे उद्योग करत आहेत. मतदारांनी मतदान प्रक्रियेला केवळ एक संधी म्हणून न बघता लोक चळवळ म्हणून पहावे. त्या माध्यमातून परिवर्तन साधने शक्य होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन या फोडाफोडी करणार्‍यांच्या विरोधात एक लढा उभारलेला आहे. या लढ्यामध्ये मतदार म्हणून आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. जावली तालुक्यातील महू-हातगेघर धरण का अपूर्ण राहिले ? जावळी तालुक्याचा विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या आकड्यांची ठेकेदारांच्या सोयीची कामे, असा त्याचा अर्थ नाही. हे धरण जर पूर्ण झाले असते तर 1300 हेक्टर जमीन धरणाच्या पावणेदोन टीएमसीच्या क्षमतेमुळे ओलीताखाली आली असती. येथेच शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला संधी मिळाली असती. मात्र सत्ताधार्‍यांनी या धरणाकडे अजिबात संवेदनशीलतेने पाहिले नाही. हे धरण अपूर्ण ठेवायचे पाप कोणी केले, याचे उत्तर जनतेला ठाऊक आहे. परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये मतदारांनी या बाबी लक्षात ठेवूनच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

जावली तालुकाप्रमुख निलेश गोळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अमितदादा कदम, सदाशिव सपकाळ यांच्यासह शिवसेना जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारिणीच्या सदस्यांनी गणेशपेठ, रुईघर, शिंदेवाडी, काटवली, बेलोशी, दापवडी, महू, पिंपळी, गावडेवाडी, बलकवडेवाडी, बिरामणेवाडी, राजपुरेवाडी, हातगेघर, कावडी, सनपाने, टोपेवाडी, वाहगाव,रांजणी, करहर, खर्शी, बारमुरे, असा 25 गाव भेटीचा दौरा पार पाडला. या दौर्‍यामुळे जावली तालुक्यामधील शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमितदादा कदम यांच्या प्रचाराला गती
पुढील बातमी
काहींची पक्षांतराची भूमिका ठेकेदारांच्या फायद्यासाठी

संबंधित बातम्या