उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात अनेक नकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते. थकवा, अशक्तपणा, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र याच सामान्य समस्या पुढे जाऊन मोठ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी जेवायला बसल्यानंतर आपल्यातील अनेकांना सतत घाम येऊ लागतो. जणू घामाची आंघोळचं केली आहे, असे वाटू लागते. प्रत्येक व्यक्तीला नेहमी घाम येतो. शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर पडून जातात.
बऱ्याचदा जेवायला बसल्यानंतर सतत घाम येऊ लागतो. याशिवाय जेवणात अतिउष्ण किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे सुद्धा घाम येतो. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेच ना जेवायला बसल्यानंतर सतत घाम का येतो? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. जेवायला बसल्यानंतर सतत घाम येण्याची कारणे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.
जेवायला बसल्यानंतर घाम येण्याची कारणे?
पचनसंस्था:
जेवलेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा वापरावी लागते. ज्यामुळे काहीवेळा शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. शरीराच्या तापमानात वाढ झाल्यानंतर सतत घाम येऊ लागतो. याशिवाय रोजच्या जेवणात अतितेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला जास्त घाम येण्याची शक्यता असते. पोटात तयार झालेली उष्णता घामावाटे बाहेर येते.
हायपरहाइड्रोसिस:
हायपरहाइड्रोसिसची समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला नेहमीपेक्षा जास्त घाम येऊ लागतो. जास्त घाम आल्यानंतर बऱ्याचदा अंघोळ केल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे जेवताना सुद्धा ही समस्या उद्भवू लागते. ज्या व्यक्तीच्या शरीराला जास्त घाम येतो, त्याच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
वैद्यकीय स्थिती:
मधुमेह, हृद्यासंबंधित आजार, थायरॉईड इत्यादी आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना कोणत्याही वेळी घाम येऊ लागतो. त्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.
मानसिक तणाव आणि चिंता:
दैनंदिन आयुष्य जगताना अनेक लोक सतत मानसिक तणाव, चिंता, नैराश्य इत्यादी मानसिक आरोग्यासंबंधित समस्येने त्रस्त असतात. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाल्यानंतर जेवायला बसल्यानंतर किंवा कोणत्याही वेळी घाम येऊ लागतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारणे आवश्यक आहे. शरीरात रक्तदाब, चिंता, तणाव वाढल्यानंतर सुद्धा घाम येऊ लागतो.