हजारमाची विशेष ग्रामसभेत पोलिसांकडून लाठीचार्ज

by Team Satara Today | published on : 25 June 2025


कराड : हजारमाची ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यासाठी सोमवारी बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत गोंधळ उडाला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. गोंधळ अधिक वाढून वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. विभाजनासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेवरच दोन्ही बाजूंकडून आक्षेप घेण्यात आल्याने शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. 

हजारमाची ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दीपाच्या ओढ्याच्या पश्चिम भागासाठी वेगळी ग्रामपंचायत मिळावी, अशी मागणी येथील काही लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु या विभाजनास पूर्व भागातील लोकप्रतिनिंधी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. याचा निर्णय सामान्य जनतेच्या हाती सोपविण्यात आला होता.

सोमवारी जनमत घेण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या प्रक्रियेसाठी दहा ते दोन अशी वेळ देण्यात आली होती. परंतु प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे प्रक्रियेला बराच वेळ लागला. यामुळे वृद्ध आणि विशेषतः महिलांना याचा त्रास सहन करावा लागला. हजारमाची सदाशिवगड येथील मतदारांनी हजारमाची सदाशिवगड ग्रामपंचायत एकच रहावी विभाजन होवू नये या बाजूने कौल दिला.

सुरूवातीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची संख्या असल्याने मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची याचे प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे जवळपास दीड-दोन तास गदारोळ चालला होता. यावेळी प्रशासन, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्यात बराच वेळ खडाजंगी सुरू होती. सुरूवातीला हात वर करून आपले मत नोदवण्यात यावे असे ठरले. ग्रामस्थांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळपासून महिला वर्ग, वयोवृध्द ग्रामस्थ बसून होते.त्यांचाही संयम सुटत चालला होता. त्यामुळे वेळेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून ग्रामपंचायत विभाजनास विरोध असणार्‍या मतदारांना एका बाजूला तर विभाजनाची मागणी करणार्‍या मतदारांना एका बाजूला थांबवण्यात आले. परंतु दोन्ही बाजूला ग्रामस्थांची संख्या मोठी होती. अखेर दीडच्या सुमारास बसलेल्या आणि उभे राहिलेल्या ग्रामस्थांचे ब्लॉक केले.

विभाजनास विरोध असणार्‍या ग्रामस्थांना आपले आधार कार्ड हातात घेऊन हात वर करून आपले मत नोंदवण्याची सूचना देण्यात आल्या. आशा सेविकांच्या मार्फत ब्लॉक वाईज मतदार संख्या मोजून तीनच्या सुमारास त्याची नोंद प्रशासनाकडे जमा करण्यात आली. दोन्ही बाजुची मतदान झालेले नोंदी एकत्र करुन झाल्यावर पाच वाजता निकाल दिला जाणार असल्याचे ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच निर्मला जिरगे यांनी जाहीर केले.सायंकाळी पाच वाजता ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच निर्मला जिरगे यांच्या परवानगीने ग्रामसेवक यांनी निकाल वाचून जाहीर केला.यामध्ये ग्रामसभेला आलेल्या रजिस्टर नोंद झालेली एकूण संख्या 3159 आहे. तर ग्रामपंचायतीची विभाजनास विरोध 1532 मतदारांनी दर्शविला तर ग्रामपंचायत विभाजनाच्या बाजुने 1280 मतदारांनी मतदान केले असल्याचे जाहीर केले. 

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी झालेल्या गटाने जल्लोष साजरा केला.मात्र निकाल जाहीर करण्याची परवानगी देणार्‍या अध्यक्ष सरपंच जिरगे यांनीच या निकालाबाबत आपला आक्षेप असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. पराभूत गटाने दोन्ही बाजुने झालेल्या मतांची बेरीज आणि एकूण रजिस्टर झालेल्या नोंदी यामध्ये 347 मतांचा फरक असल्याने आक्षेप घेतला. याबाबत ग्रामसेवकांना गराडा घालून याबाबत खुलासा मागितला.

मतदान पार पडल्यावर आणि निकाल दिल्यावर मतांमधील तफावत दिसून आली. यामुळे या निकालावर आमचा अक्षेप होता. प्रशासनाने घाईगडबडीत सही करण्यास भाग पाडले. यामुळे हा निकाल आम्हास मान्य नाही. 

- निर्मला जिरंगे, सरपंच हजारमाची


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चायनीज मांजा कापल्याने दुचाकीस्वार जखमी
पुढील बातमी
पाटण मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करा: सत्यजितसिंह पाटणकर

संबंधित बातम्या