जालना : बाळासाहेबांचे विचारधारा सोडणारे काँग्रेस बरोबर गेले. भाजप शिवसेना नैसर्गिक युती त्यांनी तोडली. त्यामुळेच शिवसेना वाचविण्यासाठी सत्तेच्या विरोधात जाऊन जनतेच्या मनातले सरकार आम्ही आणले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जालना शहरातील आझाद मैदान येथे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अरविंदराव चव्हाण प्रतापराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई ठाण्यानंतर मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मराठवाड्याचा लाडका नेता एकच तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेना वाढविण्यासाठी त्यावेळेस खोतकर यांनी रक्ताचे पाणी केले. कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. अर्जुन खोतकर यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र चक्रव्यू भेदण्याची कला खोतकर यांच्यात आहे. त्यांच्या मागे श्रीकृष्णाच्या रूपात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व अरविंद चव्हाण हे दोघे उभे आहेत. ते खोतकर यांना विधानभावनापर्यंत पोहोचतील. जालना शहर हे मराठवाड्याची शान आहे आणि अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण आहे.
आमच्यावर काहीजण लहान मुलांसारखे धनुष्यबाण चोरल्याचा आरोप करतात. हे बाळासाहेबांचे धनुष्यबाण आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेले धनुष्यबाण आम्ही वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेच्या विरोधात जाऊन जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणला आहे. विरोधकांनी लाडक्या बहिणी योजनेत खोडा घालण्याचे काम केले.
या निवडणुकीत लाडक्या बहिणी त्यांना घरी पाठविण्याचे काम करतील. सकाळ संध्याकाळ काही जण एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप देण्याचे काम करतात. त्या लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांच्या अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ व आमचा दोन सव्वा दोन वर्षाचा काळ याची तुलना करून पहा, असे आवाहन त्यांनी केले.