सातारा : महू-हातगेघर, बोंडारवाडी या प्रकल्पाचे प्रश्न सुटले तर सातारा- जावळी तालुक्यातील जनतेला पोटापाण्यासाठी विस्थापित व्हावे लागणार नाही. मुंबईकडे होणारे विस्थापन थांबवण्यासाठी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सन्मानाने मुख्यमंत्री करण्यासाठी मतदार सातारा - जावळीत राजकीय परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास सातारा - जावळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.
सातारा -जावळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा संवाद मिळावा कोपरखैरणे, नवी मुंबई येथे झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सदाशिव सपकाळ, जावळी बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हनुमंत चवरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शंकरराव सपकाळ, नवी मुंबईच्या महिला आघाडीचा जिल्हा प्रमुख रंजना शिंत्रे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख रामचंद्र चिकणे आदी प्रमुख उपस्थित होते.
कोपरखैरणे येथील कै. आ. अण्णासाहेब पाटील स्मृतिभवन अमितदादा कदम यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईस्थित सातारा जावळीच्या मूलनिवासी मतदारांनी खच्चून भरले होते. या सभेत बोलताना अमितदादा कदम यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अमितदादा म्हणाले, जनतेच्या मतावर निवडून यायचे, प्रतिष्ठा गाजवायची आणि ठेकेदारी राजकारण करायचे, हे गेली १५ वर्षे सातारा - जावळीतील जनता पहात आहे. २५ वर्षे एकाच घरात सत्ता आहे. आजही सातारा शहराचे प्रश्न प्रलंबित आहेत. महू -हातगेघर, बोंडारवाडी प्रकल्पाचे प्रश्न रेंगाळत पडलेत. येथील जनता एखादा प्रश्न घेऊन विद्यमान लोकप्रतिनिधींकडे गेली तर यांच्या चेहऱ्यावर आट्या पडतात. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्याविषयी घृणा वाटत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे सांगायची वेळ आज आली आहे.
कोरडवाहू अल्प जमीन, शेतीला पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही, तोकड्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा. या गरजेतून सातारा-जावळीतील शिकल्या सवरल्या पिढीने नवी मुंबई भागात स्थलांतर केले. बुद्धिमत्तेच्या जोरावर आज ही पिढी स्थिरस्थावर आहे. दुर्दैवाने गावाकडे मात्र परिस्थिती अधिक बिकट आहे. अर्धीनिम्मी गावे कुलूप बंद आहेत. लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घातले असते तर पोटापाण्यासाठी कुटुंबांचे होणारे विस्थापन रोखू शकले असते.
उद्याची विधानसभेची निवडणूक ही निवडणूक नसून परिवर्तनाची चळवळ आहे. परिवर्तन शिवसैनिकाला नवीन नाही. अत्यंत अपमानास्पद पद्धतीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला सोडावा लागला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री करण्याचा विडा शिवसैनिकांनी उचलला आहे. सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून कडवा शिवसैनिक आपली ताकद यावेळी दाखवून देईल, असा विश्वासही अमितदादा कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या संस्थांमधील घोटाळे बाहेर येऊ नयेत, इडी- सीबीआयच्या धाडी पडू नयेत म्हणून शिवेंद्रराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज हीच मंडळी पक्षांतर केलं म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका सदाशिवभाऊ सपकाळ यांनी भाषणात केली. महू - हातगेघर धरणाचं काम ९० टक्के पूर्ण झाले, केवळ कालव्याची कामे बाकी आहेत. हे काम पूर्ण झाल्यास तब्बल १३ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. शेतीमधील उत्पन्न वाढल्याने कुटुंबातील युवकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही. मात्र दुसऱ्याला राजकीय श्रेय मिळू नये यासाठी २५ वर्ष कालव्याची कामे होऊ दिली गेली नाहीत. मतदार संघातील प्रश्नावर विद्यमान लोकप्रतिनिधींनी सभागृहात कधीही तोंड उघडले नाही. इकडे अधिवेशन चालू असताना लोकप्रतिनिधी मात्र कारखान्यावर खुर्ची टाकून बसायचे. कारण काय तर यांना उसाच्या ट्रॉल्या मोजायच्या होत्या. यामध्येही अर्थकारण दडला आहे हे वेगळं सांगायला नको. अमितदादा यांच्यासारख्या धडाडीच्या व शिस्तीत वाढलेल्या तरुणाकडे नेतृत्व देण्याची आज वेळ आली आहे. हातात भगवा घेतलेल्या अमितदादांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे. महू हातगेघर, बोंडारवाडी या प्रकल्पांची कामे मी त्यांच्याकडून पूर्ण करून घेईन, असा शब्दही सदाशिव सपकाळ यांनी यावेळी दिला.
सातारा व जावळी तालुक्यातील मूलनिवासी मुंबईकरांच्या विविध विभागांच्या वतीने अमितदादा कदम यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जावळीचे संपर्कप्रमुख नामदेव बांदल, कोपरखैरणे येथील शिवसेना शहरप्रमुख बेबीताई लांडगे, विभाग प्रमुख लहूराज सुर्वे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख विलास भणगे, सातारा तालुक्याचे माजी संपर्कप्रमुख हनुमंत भिलारे, परळी विभाग संघटक नारायण निकम, विश्वनाथ धनवडे, वसंत शेलार, जगदीश कदम, प्रवीण धनावडे, संपतराव उतेकर, स्नेहलता चिकणे, उपविभाग प्रमुख नालासोपाराचे सुनील शिंदे, माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे, प्रकाश शेलार, प्रदेश काँग्रेसचे प्रदीप शेलार, सखाराम साळुंखे व कोपरखैरणे भागातील सातारा जावळीचे मूलनिवासी नागरिक, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.