सातारा : महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. वाई तालुक्यातील बावधन या ठिकाणी बगाड यात्रेला सुरुवात झाली. आज रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा होत असते. या यात्रेला सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक येत असतात. यावेळी लाखो भाविक उपस्थिती लावतात.
या वर्षीचा मान अजित ननावरे यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे ५० फुटी बगाडाला नवसाचा मान मिळालेल्या बगाड्या भक्तास बांधले जाते. बैलांच्या सहाय्याने बगाड ओढलं जातं. बगाड ओढायला सुमारे ५०० बैलांना जुंपल जातं. साडे तीनशे वर्षापासून ही यात्रा साजरी होत आहे. ५० फूट उंच बगाड गावापासून ५ किलोमीटर पर्यंत बैलांच्या मदतीने ओढले जाते.
'बगाड' हे या यात्रेचं मुख्य आकर्षण. ओझर्डे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या तिरावर असलेले 'सोनेश्वराचे मंदिर' 18 व्या शतकात पिसाळ देशमुखांनी बांधले आहे. श्री शंकराची आकर्षक पिंड येथे असून पिंडीसमोरील नंदीच्या गळ्यात बगाड्याची प्रतिकृती आहे. सुमारे 350 वर्षांपासून बगाड यात्रेस सुरुवात झाली. होळी पौर्णिमेला भैरवनाथाच्या मंदिरात 'नवसकार्याचा' कौल लावला जातो. उजवा कौल ज्याचा तो 'बगाड्या' ठरतो. यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरातच राहतो. होळी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत बगाड्याचा उपवास असतो. बगाडाचा रथही वैशिष्ट्यपूर्ण असतो. गावच्या थोरल्या विहिरीतील बगाडाचे खांब, कणा, बोटले रथासाठी वाजतगाजत मंदिरासमोर आणतात. बगाडाचा रथ तयार करणे हाही यात्रेचाच भाग आहे. या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. 10 फूट लांबीच्या कण्याला 18 फूट उंच वाघाचे तोंड असलेले खांब जोडून त्यावर 40 फूट उंच बांबूंचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते. शीडाच्या टोकाला झोपाळा असतो. त्यावर लोखंडी गळात बगाड्याला टांगले जाते.
चतुर्थीला गावात छबिना निघतो. देवाच्या पालखीसमोर ढोल, लेझिम, सनई, दांडपट्टा असे विविध खेळ सादर केले जातात. पंचमीच्या पहाटे पालखीबरोबरच बगाड्या सोनेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचतो. कृष्णा नदीत स्नान करून सोनेश्वराला नैवेद्य अर्पण करून, कृष्णामाईची ओटी भरून बगाड्याला शीडावर टांगले जाते. 'काशीनाथाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात बगाड मिरवणुकीस सुरुवात होते. नांगरट केलेल्या जमिनीतून बगाडाचा रथ धावत असला तरी बगाड्याला विशिष्टरीत्या बांधल्यामुळे त्याला त्रास होत नाही. हा रथ ओढण्यासाठी 6 बैलजोड्या असतात. यात्रेसाठी खास रतीब देऊन बैल बनवले जातात. कसलेले खिल्लारी बैल हा गाडा ओढतात. 4 कि. मी. अंतराच्या या बगाड यात्रेत अबालवृद्ध, स्त्री-पुरुष भक्तिभावाने सामील होतात. जेथे बगाड रुतून बसते तेथे गोमुत्र शिंपडून गोल रिंगण घेतले जाते. गावात प्रवेश होताच 'रिंगण' घेतले जाते.
बावधनच्या बगाडाची कीर्ती महाराष्ट्रभर आहे. बावधनसह बारा वाड्यातील ग्रामस्थ उत्सवात सहभागी होतात. नवस पूर्ण झालेले भाविक बगाडास गोंडे बांधतात. 'काशीनाथाच्या नावानं चांगभलं' च्या गजरात बगाडाची सांगता होते. बावधन बगाडाची यात्रा आपल्या वेगळेपणामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. बगाडाचा गाडा किंवा रथ, त्याचे शीड, गळाला टांगलेला बगाड्या, गाडा ओढणारे बैल, खडतर रस्ता, बगाड्याचा पोषाख, त्याची व्रत वैकल्ये याची सर्वत्र चर्चा होत असते.
बावधन ग्रामस्थांच्या एकीचे प्रकर्षाने दर्शन या यात्रेत घडते. सारे गाव यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असते. 'काशीनाथाचं चांगभलं' म्हणत प्रत्येक गोष्ट होत असते. या गजरात इतकी प्रचंड शक्ती व प्रेरणा स्त्रोत आहे की, मोठमोठे बांबू, शिडाची घडण आदी अवजड कामे केवळ सांघिक शक्तीतून सहजपणे पार पडतात. बगाडावरील पिसाळ-भोसले मानकरी, बैल जुपणारे मानकरी, शिडाला तेल घालणारी व्यक्ती, सर्व बलुतेदार आपापली भूमिका चोखपणे पार पाडतात. ही यात्रा आपल्या एकोप्याने इतर गावांनाही एकात्मता शिकवते…– धनंजय घोडके, वाई