सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (पारंपारीक) 29 एप्रिल रोजी व 12 मे रोजी बुद्धपौर्णिमा यासह विविध उत्सव साजरे होणार आहेत. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणेकरिता ढोल, ताशे इतर वाद्ये वाजवण्याचे विनियमन करुन नियंत्रण आणि ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे या करिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसारचे अधिकार दि. 29 एप्रिल ते 12 मे पर्यंतच्या कालावधीकरिता प्रदान केले आहे.
या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गासंबंधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे आसावे, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.