महाराष्ट्रात 16 ठिकाणांवर होणार युद्धसज्जतेसाठीचं मॉकड्रील

by Team Satara Today | published on : 06 May 2025


मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारा तणाव दिवसागणिक आणखी वाढला असून, या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता नव्यानं भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संघर्ष गंभीर वळण घेताना दिसत असून, एकिकडे युद्धाच्या चर्चांनीही डोकं वर काढलं. याच परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्रालयानं अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या धर्तीवर मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले. 

युद्धकाळातील उपायांचा सराव या मॉक ड्रीलअंतर्गत घेतला जाणार असून यादरम्यान नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई हल्ल्यांदरम्यान स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण नेमकं कसं करायचं यासंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तणावाच्या या परिस्थितीत सातत्यानं वाढ होत असल्यानं हे मॉकड्रील घेतलं जाणार असून, महाराष्ट्रातील 16 ठिकाणांवर त्याचा सराव पार पडेल. 

कोणत्या ठिकाणी पार पडणार मॉकड्रील? 

मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, नाशिक, नागोठणे, मनमानड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं हे मॉकड्रील पार पडेल.

मॉकड्रीलमध्ये नेमकं काय होणार? 

हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार 

हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार 

रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये यासाठी ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार 

महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येणार 

सामान्य नागरिकांना बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार 

घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्त्वं पटवून दिलं जाणार 

मॉकड्रीलदरम्यान कुठे वाजणार सायरन? 

प्रशासकीय भवन

सरकारी भवन 

पोलीस मुख्यालय 

अग्निशमन दल केंद्र/ मुख्यालय 

लष्करी तळ 

शहरातील मोठे बाजार 

गर्दीची ठिकाणं 

सायरन वाजताच नेमकं काय करावं आणि काय करु नये? 

सायरन वाजताच घाबरून जाऊ नका.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

तातडीनं सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा. 

मोकळ्या जागेपासून दूर राहा. 

रेडीओ, टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या इशाऱ्यांवर लक्ष द्या.

घरात किंवा एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा. 

देश स्तरावर एकूण 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील पार पडणार असून, 1971 नंतर देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर नागरिक सुरक्षिततेच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आल्यामुळं ही सध्याच्या क्षणाची मोठी घडामोड ठरत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात
पुढील बातमी
दहिवडी येथील सय्यद बंधूंच्या बागेला आग

संबंधित बातम्या