सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेली वक्तव्य निंदणीय आहेत. त्यामुळे राष्ट्रपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना माघारी बोलवावे, अशी मागणी सातार्यात आंबेडकरवादी संघटनांनी करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडो संघटना सदस्य सहभागी झाले होते. अमित शहा यांचा निषेध असो, संविधानाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आंबेडकरवादी चळवळीचे चंद्रकांत खंडाईत तसेच त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली. या मोर्चामध्ये सहभागी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंबेडकरवादी संघटनांचे सदस्य राजपथावरून मोर्चा काढत मोती चौकामध्ये आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे येथील वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती. मोर्चा मोती चौकातून पुन्हा कर्मवीर पथावरून पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या वक्तव्याबाबत माफी मागत नाहीत तोपर्यंत दलित चळवळीचे कार्यकर्ते हे आंदोलन करतच राहणार. अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून त्यांना माघारी बोलवावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल त्यांनी केलेले निंदनीय वक्तव्य माफ करण्यासारखे नाही. त्यांनी तातडीने पदत्याग करावा, अशी आग्रही मागणी आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने करण्यात आली.