सातारा : सातार्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मान्सूनपूर्व आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यापूर्वीच अवकाळी ने सातारा जिल्ह्याला असा तडाखा दिला की आराखडे सादर करायला वेळच मिळाला नाही. त्यापूर्वीच सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये तब्बल साधारण पाच कोटी रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप त्याला दुजोरा दिला नसला तरी निसर्गाची छेडछाड झाल्यावर काय नुकसान होते, याचा प्रत्यय सातारा वासियांना आला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये यंदा गेल्या पाच वर्षात प्रथमच मान्सूनपूर्व अवकाळीने सातारा जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. पुढील 72 तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होणे किंवा वाहने पाण्यात बुडून इंजिनचे नुकसान होणे असे अनेक प्रकार घडले आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील राज्य व जिल्हा महामार्गालगतच्या मोर्या रस्त्यांची बांधकामे तसेच दरड प्रवण आणि पूरप्रवण क्षेत्रांच्या संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाला सूचना दिल्या होत्या. तसेच धोकादायक होर्डिंग फ्लेक्स तातडीने उतरवणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, त्या-त्या कार्यक्षेत्रात तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना त्याचा इशारा इत्यादी कामे निर्देशित केली होती. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच अवकाळी चा तडाखा बसून जिल्ह्यामध्ये साधारणत: 5 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ओढ्याचा गळा आवळल्याने पाणी घरात
गोडोली कामाठीपुरा व रामराव पवार नगर येथे रुंदावलेल्या पात्रातून ओढ्यातील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरण्याचे प्रकार घडले. साईबाबा मंदिर परिसरामध्ये बेकरी, तत्सम घरांमध्ये पाणी शिरल्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोडोली येथील शिवनेरी कॉलनी मध्ये सुद्धा पाणी घरात घुसून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबतच्या लेखी तक्रारी सातारा पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या रस्त्यावरील माती काढण्यात गुंतला आहे. सातारा शहरातील मुख्य सात ओढे आणि अन्य पाण्याचे प्रवाह त्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. सध्या तरी ओढ्यांनी रस्त्यावर टाकलेली वाळू व माती हटवण्याचे काम सुरू आहे.
आंबा सीझन संपुष्टात; खरीप पिकांचा हंगाम अडचणीत येण्याची चिन्हे
सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पाऊस झाला आहे. कमी दाबाच्या चक्रीय पट्ट्यांमुळे सातत्याने पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पाऊस पडत आहे. त्यामुळे फळबागा तसेच खरीप पिकांच्या शेतकर्यांच्या तयारीला चांगलाच फटका बसला आहे. पुढील तीन दिवस पाऊस कायम राहिल्यास जमिनीमध्ये ओल तयार होईल. मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे मात्र अडचणीत आली आहेत. मार्डी तालुका माण व खटाव तालुक्यातील फळबागांचे सुद्धा साधारण 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व उपविभागातील तहसीलदारांना पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वी दिलेले आहेत. कोयना व पाटण कराड यासारख्या पूरक्षेत्र भागामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनांचा पुरवठा करण्यात आला आहे. प्रात्यक्षिक प्रशिक्षण करण्यापूर्वी प्रत्यक्ष पावसाने कार्यानुभव दिल्यामुळे सर्व कर्मचार्यांची पळापळ झाली आहे. कास तलावाला सुद्धा या पावसामुळे तीन फूट पाणी पातळी अधिक मिळाली आहे. जिल्हाधिकार्यांना मान्सूनपूर्व आराखड्यांचे अंदाज घेणे व तत्सम कारवाई करण्यापूर्वीच झालेल्या नुकसानीचे आढावे घेण्याची वेळ आली आहे. सातारा नगरपालिकेच्या 50 आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांनी शहरामध्ये पाणी निर्मूलनाची प्रक्रिया सुरू केली आहे.