दिवाळी, ख्रिसमस आणि ईद या सणांदिवशी मी हटकून ते-ते सण साजर्या करणार्या मित्रांना शुभेच्छा देत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच जेव्हापासून मोबाईल फोन वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून हा शिरस्ता आजपर्यंत चालू आहे. शुभेच्छा दिल्याने देणार्याकडून आणि घेणार्याकडून फार काही मिळत नसले तरी एकमेकांमधील दुरावलेला संवाद यानिमित्ताने पुन्हा सुरु होतो, हा माझा समज. याच महिन्यात 11 एप्रिलला भारतासह जगभरात ईद साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे संपर्कातील अनेक मित्रांना शुभेच्छापर मॅसेज पाठवले. काहींचा प्रतिसाद आला, काहींनी नुसतेच बघून सोडून दिले. असो, आपले जे काम आहे, ते केले. पण परवा अचानक एक फोन आला. ‘संग्रामभाई कहां पे हो?’ मी सातार्यात असल्याचे सांगितल्यानंतर ‘भाई मैं कोल्हापूर को जा रहा हूं, अगर आपके पास टाईम हो तो हायवे पे मिलेंगे’ मी होकार दिला. पण समोरच्याचे माझ्याकडे नक्की काय काम आहे, या विचाराने थोडा भांबवलो. परंतू काही असेल, भेटल्यानंतर बघू, असा विचार मी केला. अर्थात फोन करणारा माणूस गेल्या पाच वर्षांपासूनच्या संपर्कातला होता.
काही वर्षांपूर्वी युक्रेन तसेच रशिया या देशांमध्ये एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे काम काही मित्रांबरोबर सुरु केले होते. भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणे खूपच अवघड आणि जिकिरीचे काम. शासकीय कोट्यातून प्रवेश मिळाला तर बरे, नाहीतर पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी, तिथून त्यापुढच्या शिक्षणासाठी लाखो-कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. अशी परिस्थिती असताना युक्रेन तसेच पूर्वीच्या सोविएत संघातील देशांमध्ये हीच परिस्थिती उलट. यामुळेच भारतातील हजारो विद्यार्थी या देशांमधील वैद्यकीय संस्थानांमध्ये प्रवेश घेवून आपले शिक्षण पूर्ण करतात. या देशामधील वैद्यकीय विद्यालयांमध्ये शिकलेले हजारो डॉक्टर्स भारतामध्ये यशस्वीरित्या आपली सेवा देत आहेत. युक्रेनमधील झेप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, कीव्ह नॅशनल मेडिकल इन्स्टिट्यूट या वैद्यकीय शिक्षण देणार्या विठ्यापीठांबरोबर आमचा अधिकृत करार झाला असल्याने देशभरातील इच्छुक विद्यार्थ्यांना जर या दोन्ही विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास ते आमच्या कंपनीमार्फतच करावे लागेल. त्यामुळे देशभरातील शैक्षणिक सल्लागार (एज्युकेशनल कन्सल्टन्सी) तसेच हजारो विद्यार्थी संपर्कात येत असत. पाच-एक वर्षापूर्वी असाच एक फोन आला. अर्थात तो कोणाच्या तरी मार्फत आला होता. ‘भाई मुंबई से बात कर रहा हूं, मेरी भांजी र्हैें नीट में कम मार्क्स मिलें हैं, इधर बीएचएमएस को ऍडमिशन मिल रहा है, लेकीन हमारे को उसको एमबीबीएस ही कराना हैं’ माझे सातारी हेल असलेले हिंदी ऐकल्यानंतर समोरच्याने थेट मराठीत बोलायला सुरुवात केली. कोकणी बाज असलेली मराठी ऐकल्यानंतर मीही त्याला विचारले, ‘कोकणातील काय?’ समोरुन उत्तर आले, ‘होय, चिपळूण जवळील मिरझोळी गाव माहित आहे का? अर्थातच हे गाव मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे अग्रणी हमीद दलवाईंचे असल्याने त्यांना आणि त्यांच्या गावाला कोण ओळखत नाही? असे मी त्याला सांगितल्यावर तो अधिकच खुलला. ‘भाई, तेवढं भाच्चीचं काम करा’, अशी गळ त्याने घातली.
पुढच्याच आठवड्यात तो, त्याची आई आणि भाचीला घेवून आमच्या मुंबईस्थित कार्यालयात आला. कार्यालयातील सहकार्यांनी प्रवेशासंदर्भात इत्यंभूत माहिती सांगितल्यानंतर अखेर त्यांच्या मनाचे समाधान झाले. शेवटी बाहेरच्या देशात प्रवेश घ्यायचाय, तर मुलीच्या आई-वडिलांची परवानगी लागेल, असे सांगितल्यानंतर ‘सोडा ना साहेब, आम्हीच आई-बाप आहे, असे समजा’, असे त्याने सांगितले. परंतू नियमानुसार मुलीच्या आई-वडिलांची आम्हाला एनओसी लागते. तरच आम्ही पुढील प्रक्रिया पार पाडतो, असे सांगितल्यानंतर मात्र तो हतबल झाला. ‘साहेब दोन मिनिटं द्या, आपण दुसर्या केबिनमध्ये चर्चा करु’, अशी विनंती त्याने केली. मीही होकार दिला. ‘साहेब, लई मोठी गोष्ट आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न शेजारच्याच गावातील आमच्याच नात्यातील युवकाशी लावून दिले. दोन्ही कुटूंबे तोलामोलाची असल्यामुळे लग्न अगदी धुमधडाक्यात लावून दिले. मुलगा सौदीमधील एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करीत असल्याने आमची बहिणही तिकडेच जाणार होती. लग्नानंतर ती तिकडे गेलीही. सात महिन्यांची गरोदर असताना बहिणीच्या नवर्याचा म्हणजेच आमच्या जिजूंचा कामावरच असताना अपघात झाला आणि काही दिवसानंतर रुग्णालयातच उपचार सुरु असताना मृत्यू झाला. साहेब, आमच्यासाठी ही लई मोठी घटना होती. बहीण पोटूशी, आणि अशी घटना घडल्यामुळे दोन्ही कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जिजूंच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच आमच्या बहिणीला ही मुलगी झाली. बहिणीला आणि तिच्या मुलीला आम्ही आमच्या मुंबईतील घरी सांभाळत होतो. परंतू बहिणीला विधवा म्हणून घरात ठेवणार तरी कशी? वर्षा-दीड वर्षानंतर नातेवाईकांनी आपण तिचे दुसरे लग्न लावूयात, असा तगादा पाठी लावला. आम्हालाही ते पटत असल्याने शेवटी नात्यातच पुन्हा दुसरे लग्न जमले. पहिल्यांदा त्या लहान मुलीलाही आम्ही स्विकारतो, असा शब्द समोरच्याकडून देण्यात आला होता. मात्र, लग्नानंतर त्या लहान मुलीला आम्ही सांभाळणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. खूप त्रास दिला साहेब, शेवटी माझ्या अम्मीनेच पुढाकार घेत माझे अजून वय झालंय का? असे म्हणत त्या लहान मुलीला ओट्यात घेतले. तेव्हापासून आजपर्यंत साहेब आम्ही तिचा सांभाळ केलाय. तिला चांगलं शिक्षण दिलंय. बारावीत चांगले गुण मिळाले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी असणार्या नीट परिक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील, असे वाटले होते. पण ते मिळाले नाहीत. बर्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर बीएएमएस ला मिळत होते. पण पोरीला एमबीबीएस च करायचंय. पण साहेब, आमचं हातावरती पोट आहे. आपल्याकडं एमबीबीएस ला ऍडमिशन करायचं म्हटल्यावर किती खर्च येतो, हे आपल्यालाही माहित आहे, असं बोलल्यानंतर आपण युक्रेनमधील झेप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तिचे ऍडमिशन करुया, असं म्हटल्यानंतर गडी चांगलाच खुलला.
मुलीच्या पालकांचा विषय माझ्यादृष्टीने संपला असल्याने आम्ही ऍडमिशन द्यायला तयार झालो. खर्चाची चर्चा झाल्यानंतर आम्ही ऍडमिशन करुन घेतले. यासंदर्भातील सोपस्कार झाल्यानंतर एप्रिल 2019 मध्ये मी स्वत: युक्रेनमध्ये ऍडमिशन घेतलेले सर्व विद्यार्थी घेवून जाणार आहे आणि त्यांच्याबरोबर तुमच्या मुलीलाही घेवून जाणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना हायसे वाटले. ‘साहेब, विना आई-बापाची आम्ही पोर वाढवलेली आहे. पण तिला वाढवताना आम्ही आई-बापाची कधीच उणीव भासू दिली नाही’, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ठरल्यानुसार एप्रिल 2019 च्या साधारणत: पहिल्या आठवड्यात मी आणि माझे सहकारी असे मिळून सुमारे 30 विद्यार्थ्यांसह कीव्ह (युक्रेन)ला जायला निघालो. तिकडे जाणारी फ्लाईट थेट मुंबईतून नव्हती, दिल्लीतून होती. त्यामुळे मुंबईतून दिल्ली आणि तिथून युक्रेन असा प्रवास होता. सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून येणार असल्याने मुंबईतील एका हॉटेलमध्ये आदल्या दिवशी त्यांची राहण्याची सोय केली होती. जे मुंबईत राहत होते, त्यांची काही अडचण नव्हती. त्यांना थेट विमानतळावरच बोलावले होते. त्यानुसार वरील लोकांनीही त्यांच्या मुलीला थेट विमानतळावरच आणले होते.
विद्यार्थ्यांचे पालक आणि त्यासोबतच्या त्यांच्या नातेवाईकांमुळे विमानतळावरील ‘ते’ टर्मिनल अगदी फुलून गेले होते. जस-जसे विद्यार्थी आपले तिकिट आणि पासपोर्ट घेवून आत जावू लागले, तसतशी पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. कोणी भावूक झाले, कोणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अगदीच आत जाताना ‘त्याने’ हातात हात घेवून ‘साहेब, आमच्या पोरीवर लक्ष द्या, आमच्या पोटचा गोळा तुमच्या हातात देतोय’, अशी कळकळीची विनंती त्याने केली. पोटच्या पोरांचं ठिक आहे. परंतू स्वत:च्या भाचीसाठी एखादा मामा एवढा भावविवश होतो, ते पहिल्यांदाच पाहिले. दिल्लीतून युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह पर्यंतचा प्रवास हा विनाथांबा 9 तासांचा होता. संध्याकाळचे साधारणत: सहाला आम्ही लॅण्ड झालो. परंतू कीव्ह ते झेप्रोझिया हे अंतर रस्त्याने आठ तासांचे असल्याने आम्ही आगावू कीव्ह ते झेप्रोझिया या ट्रेनची एक बोगीच आरक्षित केली होती. कीव्ह मधून संध्याकाळी 8 वाजता झेप्रोझिया ची ट्रेन होती. सुमारे 40 जणांसाठीचे संध्याकाळचे जेवणही आम्ही कीव्ह मधूनच बरोबर घेतले होते. कारण त्या ट्रेनमध्ये चांगले जेवण मिळत नसे, हा आमचा यापूर्वीचा अनुभव होता. एप्रिलचा महिना असला तरी हाडे गोठवणारी थंडी कीव्ह शहरामध्ये होती. जायच्या अगोदरच सगळ्यांना ऊबदार कपडे सोबत घ्यायला लावल्याने फारशी अडचणी उद्भवली नाही. परंतू अशा थंडीत यापूर्वी राहण्याचा कोणाला अनुभव नसल्याने सर्वच विद्यार्थी त्रासून गेले होते. पहाटे सर्व विद्यार्थ्यांसह आम्ही झेप्रोझियाच्या वग्झाल (रशियनमध्ये ट्रेन स्टेशनला वग्झाल म्हणतात) येथे पोहोचलो. त्यानंतर अगोदरच ट्रेन स्टेशन ते युनिव्हर्सिटी होस्टेलपर्यंत एक बस आरक्षित केली होती. या बसमध्ये बसून सर्व विद्यार्थी व ती विद्यार्थीनीही होस्टेलला पोहोचले.
सकाळ-सकाळी त्या विद्यार्थीनीच्या मामाचा फोन आला. ‘साहेब, पोहोचलाय काय? आमची भाची कशी आहे’ असा प्रश्न त्याने केला. ‘सर्व सुखरुप आहेत, कालच्या प्रवासामुळे सगळे थकलेले आहेत. दुपारी सर्व विद्यार्थ्यांना येथील नवीन सिमकार्ड घेवून देणार आहोत. त्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकाल’, असे सांगितल्यावर गड्याला हायसे वाटले. पुढे मोबाईल सीम आणि अधिकृतरित्या युनिव्हर्सिटीमधील प्रवेशानंतर मामा-भाचीचा संवाद सुकर झाला. पोरगी अभ्यासात हुषार आहे, असे युनिव्हर्सिटीचे रेक्टर आणि सहअध्यायी सांगत होते. दिवस, वर्षे निघून गेली. कधी युक्रेनला जाणे झाले, तर तिची भेट व्हायची. पण शेवटी जे होऊ नये, ते झाले. 24 फेब्रुवारी 2024 ला युक्रेन-रशिया दरम्यान युद्धाला तोंड फुटले. रशियाने युक्रेनवर पूर्वेकडून हल्ला चढवला होता. डोनेक्स, लुहान्स ही राज्ये रशियाने ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. याची झळ आम्ही ज्या युनिव्हर्सिटीसाठी काम करतो, त्या झेप्रोझिया युनिव्हर्सिटीपर्यंत लवकरच पोहोचणार होती. कारण झेप्रोझिया हा युक्रेनच्या दक्षिण-पूर्वेतील मोठा आणि लष्करीदृष्ट्या महत्वाचा प्रांत असल्याने रशिया तो लवकरच ताब्यात घेईल, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली होती. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक भांबावून गेले होते. 22 फेब्रुवारी ते 11 मार्च 2022 दरम्यान मला तासाला किमान शंभर फोन यायचे. आमच्या मुला-मुलीचे काय झाले, त्यांना लवकर बाहेर काढा. जे लांबचे होते, ते फोन करत होते. जे जवळचे होते ते थेट सातारा आणि मुंबईच्या कार्यालयात धडकत होते. तुमच्या पाल्यांना आम्ही लवकरच भारतात घेवून येवू. केंद्र शासनानेही याबाबत गांभीर्याने लक्ष घातल्याने याबाबत काळजी करण्याचे काम नाही, असे समजावत होतो. लोकांचा आमच्यावर विश्वास होता, पण सरकारवर नव्हता, हे त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होते. शेवटी काही केले तरी आम्ही हतबल होतो, ते सांगायचे तरी कोणाला? झेप्रोझियातून शेकडो विद्यार्थ्यांना बाहेर काढणं गरजेचे होते. रशियाने युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह येथील विमानतळासह युक्रेनमधील महत्त्वाची विमानतळे नष्ट केलेली होती. एकूणच युक्रेनमध्ये ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला होता. रशियाची रॉकेट लॉन्चर्स आणि लढावू विमाने राजधानीसह महत्वाच्या शहरांचा वेध घेत होती. अशा परिस्थितीतही युक्रेनमधील रेलसेवा सुरु होती.
एक-दोघांना तेथून बाहेर काढणे सोपे होते. मात्र, शेकडो विद्यार्थ्यांना येथून बाहेर काढणे जिकिरीचे झालेले होते. आमच्यासह इतर कन्सल्टन्सीचे सुमारे 17 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संपूर्ण युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. असे असतानाच माझा एक सहकारी जो आमचे काम युक्रेनमध्ये पाहतो, तो योगायोगाने युक्रेनमध्येच अडकलेला होता आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुखरुप झेप्रोझियातून कीव्हपर्यंत आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याचे नाव नवीनसाई चौधरी. मूळचा आंध्रातील. परंतू व्यवसायाच्यानिमित्ताने गेली दहा वर्षे तो युक्रेनमध्येच होता. त्यामुळे युक्रेनची खडा न खडा माहिती त्याला होती. रशियन आणि युक्रेन भाषा अस्खिलितपणे बोलत असल्याने त्याला याठिकाणी वावरताना फारशी अडचण येत नव्हती. याच पठ्ठ्याने आमचे शेकडो विद्यार्थी झेप्रोझियातून बाहेर काढण्याचा विडा उचलला. युक्रेनमधील भारताच्या दूतावासामधील अधिकार्यांच्या समन्वयातून त्याने झेप्रोझिया ते कीव्ह ही ट्रेनच खास विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केली. त्यानुसार हे सर्व विद्यार्थी एका रात्रीत झेप्रोझियातून कीव्ह मध्ये पोहोचले.
रॉकेट पडत होती. विमानातून बॉम्ब टाकले जात होते. याही परिस्थितीत हे विद्यार्थी कीव्हमध्ये पोहोचले. कीव्ह सुरक्षित नव्हतेच. कीव्हमध्येच सर्वाधिक हवाई हल्ला चढवण्यात आला होता. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स बॉम्ब हल्ल्यामुळे बंद करण्यात आली होती. इकडे त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून नोडल ऑफिसर नेमून त्या-त्या जिल्ह्यातील युक्रेनमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचा डेटा गोळा केला जात होता. राज्य शासनाच्या माध्यमातून हा सर्व डेटा दिल्लीस्थित परराष्ट्र मंत्रालयाला पाठविण्यात येत होता. त्यानुसारच केंद्र शासनाने या सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय वायू दल आणि एअर इंडियाच्या माध्यमातून ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केले. परंतू यामध्ये अडचण होती. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने पाठविलेली विमाने ‘नो फ्लाय झोन’मुळे याठिकाणी उतरविण्यास अडचण होती. त्यामुळे ही विमाने युक्रेन लगतच्या देशांमध्ये उतरविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार रोमानिया या देशाची राजधानी बुखारेस्ट, मोलदोवा देशाची राजधानी चिसनाऊ तसेच पोलंडची राजधानी वर्सोव्ह येथे मदतीसाठी गेलेली विमाने उतरविण्यात आली होती. याठिकाणावरुनच विद्यार्थ्यांना ‘एअरलिफ्ट’ करण्यात आले. दुसर्या देशात विमाने उतरविणे सोपे होते. मात्र, युक्रेनमधून या देशांच्या बोर्डरपर्यंत या विद्यार्थ्यांना पोहोचवणे महा जिकिरीचे काम होते. या सर्व प्रक्रियेमध्ये युक्रेनमधील भारतीय दूतावासातील अधिकारी आपल्या कर्तव्यापासून हात झटकत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांना दिसून आले. या बाक्या प्रसंगात भारतीय दूतावासातील अधिकार्यांनी हात वर केल्यामुळे विद्यार्थ्यांना न घर का, न घाट का अशी परिस्थिती विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाली होती. याही परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये काम करणारे त्या-त्या एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे नवीनसाई चौधरीसारखे अनेक समन्वयक धावून आले. त्यांनीच या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेपार नेले. त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
सध्या भारतात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सुरु आहे. या निवडणुकीमध्येही केंद्र शासनात असलेल्या भाजपने ‘ऑपरेशन गंगा’ म्हणजेच युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणल्याचा दावा केलेला आहे आणि हाच अजेंडा त्यांनी सुरु असलेल्या निवडणुकीमध्ये वापरलेला आहे. विद्यार्थी सुखरुप भारतात आले. परंतू तिथून पुढे खरी अडचण झाली होती. 17 हजार विद्यार्थ्यांना तुम्ही भारतात आणले. पण, तिथून पुढील त्यांच्या प्रवेशाचे आणि शिक्षणाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. भारतात दिल्लीमध्ये वायू दलाच्या ग्लोबमास्टर सी-70 विमानाने झेप्रोझियातील विद्यार्थी सुखरुप पोहोचले. माझ्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर त्या मुलीचा मामाही दिल्लीत माझ्याबरोबर होता. भाची दिसताच त्याने तिला कवटाळले. ओक्साबोक्शी रडला. मन मोकळे झाले. दिल्ली ते मुंबई हा प्रवास पुन्हा झाला. पाल्य घरी पोहोचल्याचा आनंद प्रत्येक पालकाला झाला होता. मात्र हा आनंद औट घटकेचा होता. मुलांच्या पुढील शिक्षणाचे काय, असा प्रश्न त्या मामासह अनेक पालक करीत होते. युक्रेनसह इतर अनेक देशातील विविध युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही ऍडमिशनची कामे करीत असल्याने आमच्यासाठी फारसा अडचणीचा प्रश्न नव्हता. युक्रेनमधून आलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचा काही महिन्यांतच आम्ही उजबेकिस्तानमधील ताश्कंद मेडिकल ऍकेडमीमध्ये प्रवेश केला. आज तिसर्या वर्षात असणारे चौथ्या वर्षात शिकताहेत. चौथ्या वर्षात असणारे एफएमजीई परिक्षा देवून भारतातील विविध रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. ती मुलगी आता उजबेकिस्तानातील ताश्कंद येथील ताश्कंद मेडिकल ऍकेडमीमध्ये शेवटच्या वर्षाला आहे. तीही एमबीबीएस पूर्ण करुन काही दिवसांत भारतात येईल. आई-बापाविना वाढलेल्या या मुलीला जिद्दीपोटी आजीने आणि मामाने डॉक्टर केले, हे छातीठोकपणे जगाला सांगेल.
परवा म्हणजेच ईद च्या दिवशी माझी विद्यार्थीनी असलेल्या ‘जैतुन ला म्हणजेच जैतून शेख ला ईद मुबारक’ असा मॅसेज पाठवून शुभेच्छा दिल्या. मॅसेज पाहिल्यानंतर किमान वर्षानंतर तिचा थेट फोनच आला. ‘हाऊ आर यू सर? आपकी तबियत कैसी है? पिछले साल जब आप ताश्कंद आये थे, तब आप बिमार थे’ असा प्रश्न तिने केला. तिला म्हटले, ‘मी एकदम ठणठणीत आहे. आता तू डॉक्टर होणार आहेस. त्यामुळे तुला सांगतो, थोडंसं कोलेस्ट्रोल वाढलंय. त्यामध्ये थोडंसं ट्रायग्लिसराईडस हाय आहे’, असं सांगताच ती म्हणाली, ‘सर आपका ट्रॅव्हलिंग बहोत ज्यादा है, ऑयली खाना ऍव्हॉयड करो’, असा सल्ला द्यायलाही ती विसरली नाही. शेवटी एकमेकांना ‘टेक केअर’ म्हटल्यानंतर फोन बंद झाला. चारच दिवसांपूर्वी अगोदर म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरला जाणार्या तिच्या मामाचा फोन आला. मीही सातार्यात असल्याने सातार्यातील महामार्गालगत असणार्या बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात भेट झाली. चहापाणी झाल्यानंतर त्याने एक पिशवी हातात दिली. घरी आल्यानंतर पिशवीमध्ये नक्की काय आहे, अशी उत्सुकता दाटल्यानंतर पिशवी उघडली आणि बघतोय तर काय, यामध्ये दोन ऑलिव्ह ऑईलच्या बाटल्या होत्या. यापूर्वी या तेलाबद्दल ऐकले होते. पण प्रथमच प्रत्यक्ष या बाटल्या पाहिल्यानंतर अप्रुप वाटले. श्रीमंत, अती श्रीमंत लोक जेवणामध्ये हे तेल वापरतात. हजारो रुपये लिटर असणारे हे तेल माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला कसे परवडणार? ऍण्टी ऑक्सिडंट, अनसॅच्युरेटेड फॅट असलेले हे तेल हृदयासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे डॉक्टर्स आणि जाणकार सांगतात. जैतून शेख या माझ्या विद्यार्थीनीने अगदी प्रेमाने पाठवलेल्या भेटीने आस्मादिक सुखावून गेले. ऑलिव्हला फारसी आणि ऊर्दूमध्ये जैतूनच म्हणतात, हे तिला माहित आहे की नाही, हे सांगू शकत नसलो तरी पुढच्या वेळेला नक्कीच तिला याबद्दल सांगेन.
- संग्राम निकाळजे.
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |