06:03pm | Sep 09, 2023 |
मा. नागनाथ नायकवडी यांना इस्लामपूर जेलमधून सुरक्षित अशा सातारा जेलमध्ये काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री हलवले. अण्णांना पकडून तुरुंगात डांबल्याचा ४० वा दिवस. सातारचा तुरुंग उंच उंच काळ्या दगडाच्या चारी बाजूंनी भिंती असलेला. तुरुंगाला मोठे प्रवेशद्वार. सतत जेल मध्ये हत्यारे असलेल्या पोलिसांचा पहारा. मध्ये मैदान आतल्या आत कैद्यांना ठेवण्यासाठी बंद कोठडी. कैद्यांच्या अंघोळीसाठी मोठा पाण्याचा हौद. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक घर. धान्याचे भांडार. रात्री सर्व कैद्यांची हजेरी घेऊन सर्वांना बराकीमध्ये डांबले जायचे. बराकीच्या दरवाजाला कुलूप घातले जायचे. रात्रभर पोलिसांचा कडक पहारा असायचा. सकाळी सर्वांना प्रातर्विधी व अंघोळीसाठी मोकळे सोडले जायचे. बर्डे गुरुजींना ज्या बराकमध्ये ठेवले होते. त्याच बराकीत नागनाथ अण्णांना ठेवण्यात आले होते. नागनाथअण्णा व बर्डे गुरुजी दोघांच्यावर पाळत ठेवण्यासाठी अडिसरे पोलिसाला नेमले. अडिसरे वाळव्या जवळील नागठाणचेच होते. सकाळी नेहमीप्रमाणे एका हवालदाराने प्रत्येक बराकीचे कुलूप काढले. सर्व कैदी प्रातर्विधीसाठी व अंघोळीसाठी बाहेर आले. नागनाथ अण्णा बाहेर आले. ते मोकळ्या मैदानात थांबले. तेथे कामेरीचे एस.बी.पाटील त्यांना भेटले. अण्णा एस.बी.ना म्हणाले, इंग्रजांनी ज्यांनी मला पकडून माझा अपमान केलाय. मला तुरुंगात राहायचे नाही! काही झाले तरी मला येथून बाहेर पडायचे आहे. मेलो तरी चालेल मी आनंदाने गोळी झेलीन पण तुरुंगात खितपत पडणार नाही. तू ही माझ्या बरोबर तुरुंग फोडणार? येणार माझ्या बरोबर?” एस.बी.पाटील, “नाही माझी शिक्षा संपत आली आहे. थोड्याच दिवसात मी बाहेर पडणार आहे.” अण्णा - मग मला मदत तरी करणार ना? एस.बी- अरे नागनाथ आपण स्वातंत्र्यासाठी प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या पायरीवर शपथ घेतली आहे. मी विसरणार कसा? जीव गेला तरी बेहत्तर. पोलिसांचा मार खावा लागल तरी बेहत्तर मी तुला मदत करणार. सर्वतोपरी मदत करणार. नागनाथ अण्णा व एस.बी.पाटील पुन्हा एका बाजूला जाऊन बोलत बसले. एस.बी.पाटील सातारमध्ये बरेच दिवस राहिलेले. त्यात एक दोन वेळा आजारी पडल्यानंतर दवाखान्यात नेत असताना पाहिले होते. तुरुंगाच्या भिंती नंतर भोवताल दुसरया भिंतीचे कंपौंड , भींत पश्चिमेच्या बाजूस पडलेली. तेथे तारेचे कंपौंड घातलेले. पश्चिमच्या बाजूला लहान मुलांनी तारेचे कंपौंडमधील तार वाकवून खेळण्यासाठी विटी,चेंडू आणण्यासाठी वाट केलेली. त्यातून भिंती लगतचा चारा खाणेसाठी गावातील मोकाट जनावरेही ये जा करत होती. त्या बाजूनेच बाहेर पडता येणार होते. रहाता प्रश्न भिंतीवरून पलीकडे जायचे कसे? हे सोपे नव्हते. भिंतीवर फुटक्या काचा रोवलेल्या भिंतीचा तट उंच. वर चढणे सोपे नव्हते. दोघानी विचार केला. अण्णा व एस.बी.नी व्यायामासाठी फिरताना जागा निश्चित केली. मदतीसाठी अजून दोघांची गरज. वशीचा साळी. तो एस.बी. चा मित्र झालेला. दुसरा नेर्लेचा शामू रामा पाटील या दोघाना एस.बी.ने तयार केले. दुसरे दिवशी बेत निश्चित केला. सकाळी सोडल्यानंतर नागनाथ अण्णा, बर्डे गुरूजी बराक मधून बाहेर आले. बर्डे गुरूजींनी हात पाय धुण्यासाठी हौदाकडे जायचे. त्यांनी तेथे वेळ काढूपणा करायचा. जास्त वेळ लावायचा. एक पोलीस कुलपे काढायच्या नादात आपोआप राहातोय. तिसरा पोलीस धान्य कोठारात जाऊन धान्य ताब्यात घेण्यासाठी जातोय. हिरु नावाचा एस.बी.चा मित्र दीर्घ शिक्षा भोगणारा. त्याची मेसची पाळी. त्यांनी त्या पोलिसाला तेथेच बोलत ठेवायचे. गुंगवायचे. ठरल्या प्रमाणे सर्व झाले. अडिसरे बर्डे गुरुजींच्या बरोबर गेला. एस.बी.पाटील साळी व शामू रामा पाटील बाहेर आले. अण्णांनाही चौघे ही जेथून पलायन करायचे तेथे भिंतीजवळ गेले. वशीचे साळी व नेर्लेचे बाबू रामा पाटील यांचे बंधू शामू रामा पाटील भिंतीकडे तोंड करून बसले. त्यांच्या खांद्यावर एस.बी.पाटील चढले व भिंतीकडे तोंड करून बसले. लगेच नागनाथ अण्णा एस.बी.च्या खांध्यावर बसले. सुरवातीला तळाची जोडी उभी राहिली. नंतर एस.बी.पाटील उभे राहिले. शेवटी अण्णा उभा राहिले. अण्णांचे डोक भिंतीच्या उंचीबरोबर आले. अण्णांनी स्वत:चे पंजे फेडले. एक टोक एस.बी.च्या हातात दिले. दुसरे टोक स्वत:कडे धरून हातावर जोर देऊन भिंतीवर चढले धोतराचा एक शेवट एस.बी.च्या हातात दुसरा शेवट दोरी सारखा धरून नागनाथ अण्णांनी भारत माता की जय म्हणून भिंतीवरून खाली उडी मारली. तो दिवस होता १० सप्टेंबर १९४४. २० फुट उंचीच्या भिंतीवरून खाली उडी मारली. तळहातालाही जखम झाली. रक्त थांबवण्यासाठी अण्णांनी जमिनीवरची माती जखमेत भरली. वेळ होती सकाळी दिवस उगवण्याची. वार रविवार. दुसरया भिंतीचे कंपौंड पडलेल्या जागी तार वाकवून अगोदरच रस्ता केलेला. त्या रस्त्यातून समोर बघतच अण्णा बाहेर पडले. बाहेर पडताना गवत उपटले. शेळीला गवत उपटून घेतोय असा बहाणा केला. समोर पोलीस चाळ होती. एक पोलीस हातात पिशवी घेऊन पोलीस चाळीत निघाला होता. अण्णांनी त्याला पाहिले. पवित्रा बदलला. अण्णा त्या पोलिसाच्या पाठोपाठ चाळीत निघाले. त्यामुळे त्या पोलिसाला संशय आला नाही. अण्णांना पोलीस चाळीतूनच जावे लागणार होते. घराबाहेर येवढ्या सकाळी कोणी नव्हते. अण्णां लगेच चाळीतून बाहेर पडून सातारा शहरात घुसले. अण्णांना पहाणारयांना संशय आला नाही. कारण ते पोलीस चाळीतूनच आले होते. चालत असताना एका घरावर वकिलाची पाटी दिसली. अण्णांचा मोठा विश्वास शिक्षक व वकिलांच्यावर. हे लोक देशप्रेमी आहेत. अण्णा वकिलाच्या घरात शिरले. त्याकाळी शिक्षक व वकील जवळ जवळ सर्वच राष्ट्रप्रेमी होते. वकिलाची मदत होईल या आशेपोटी अण्णा त्या वकिलाच्या घरात शिरले. घर जोशी वकिलाचें होते. अण्णा सोप्यातल्या खुर्चीवर बसले. समोर पहातात तो पंचम जॉर्जचा फोटो लावलेला. पटकन बाहेर पडले. कारण ते घर गोरया इंग्रज साहेबांचे होते. नागनाथअण्णा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरात आले. तेथे सुखटणकर आपल्या मोठ्या मुलीला खांध्यावर घेऊन उभे होते. अण्णा, “तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला ओळखतो. मी नागनाथ नायकवडी. मी जेल फोडून बाहेर आलोय. तुम्ही गणी भाईना बोलवता का?” सुखटणकर,“मी तुम्हाला पाहिले नाही. पण तुमच्या विषयी सर्व ऐकून आहे.” सुखटणकरनी गणीभाई आत्तारना बोलवण्यास एक व्यक्ती पाठवली. नागनाथअण्णा घरातील कर्मवीरांच्या मच्छरदाणी लावलेल्या कॉटवर जाऊन निवांत झोपले. इकडे सातारा जेलमध्ये हाहा:कार माजला. जेल मधील सर्व पोलीस एकत्र जमा झाले. सर्व जेलचा कोपरान कोपरा शोधून पाहिला. नागनाथ नायकवडी कुठे दिसेनात. त्यांचा पत्ता तुरुंगात कोठे लागेना. शेवटी पोलिसांनी बिगुल वाजवला. पोलिसांची धावपळ सुरू झाली. जेलर साहेब लगेच हजर झाले. सर्व पोलिसांना शोधासाठी साताऱ्यात पाठवले. घोडेस्वार पोलीस सातारा शहरात फिरू लागले. नागनाथअण्णांच्या फोटोच्या कॉपी काढून पोलीस दिसेल त्याला विचारू लागले. हा माणूस दिसला का? शोधाशोध सुरू झाली. सातारा डी.एस.पी.ने बेळगावला कळवून १००० पोलिसांची फौज मागवून घेतली. सातारा शहराला वेढा दिला. सातारा रेल्वे स्टेशनवर पोलिसांची एक तुकडी पाठवली. सातारा-कोल्हापूर रस्त्यावर पोलिसांची तुकडी पाठवली. नागनाथ अण्णांचे गाव वाळवा असल्याने त्या रस्त्याने अण्णा जाणार म्हणून तो रस्ता पूर्ण पोलिसांनी अडवला. सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांना तारेने नागनाथ अण्णांनी तुरुंगातून पलायन केल्याचे कळवले. मेढा, भुईज, कोरेगांव, कराड व आसपासच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये कळवून नाकेबंदी केली. सुखटणकरानी पाठवलेला निरोप गणी आत्तारना मिळताच गणी आत्तार लगेच कर्मवीरांच्या घरी आले. नागनाथ अण्णा कर्मवीरांच्या कॉटवर झोपले होते. गणी आत्तार यांनी नागनाथ अण्णांना बरोबर घेऊन आपल्या घरी गेले. घराच्या पाठीमागच्या दाराने प्रवेश केला. त्यांच्या पत्नीने जेवण तयार केले. दोघांना ताटे केली. पण नागनाथ अण्णा जेवणाकडे पहात राहिले. ते गणी आत्तारांच्या लक्षात आले. ते म्हणाले, “अरे नागनाथ माझ्या घरात भिण्याचे कारण नाही. अरे बाबा या गणीचा अगोदर मुडदा पडेल. मगच पोलीस उंबरयाच्या आत पाऊल ठेवतील.” एका प्राध्यापकाचे धाडस पाहून अण्णांना आनंद वाटला. अटक झाल्यापासून तीन चतकोर भाकरी खायची. एक चतकोर भाकरी बाजूला काढून ठेवायची. तुरुंगातून सुटल्यानंतरच पोटभर जेवायचे. अण्णानी व्रत केले. ते आज व्रत गणी आत्तारच्या एक मुस्लीम मित्राच्या घरी अण्णांनी सोडले. अण्णा पोटभर जेवले. हे व्रत चव्वेचाळिसाव्या दिवशी सोडले. त्या दिवशी दिवसभर नागनाथ अण्णा गणी आत्तारांच्या घरी राहिले. संपूर्ण सातारा पोलिसांनी वेढला. घराच्या दारावरुन रस्त्यावरून घोडेस्वार पोलीस टापांचा आवाज करीत जाताना दिसत होते. बेळगांवहून आलेले पोलीस संपूर्ण साताऱ्यात फिरताना पहायला मिळत होते. पोलिसांनी सर्व सातारा पिंजून काढला. गणीभाईनी त्यांच्या घराजवळच रहात असलेले आष्ट्याचे साहेबराव संदे व महादेव गणपती पाटील यांना बोलावून घेतले. गणीभाईनी महादेव पाटलांची ओळख करून दिली. साहेबलाल संदे तर नागनाथ अण्णांचे आष्ट्यामधील वर्गमित्रच होते. साहेबलाल संदेनी पुढचे सर्व आयुष्य रयत शिक्षण संस्थेची सेवा करण्यात घालवले. महादेवराव गणपती पाटील हे ही वाळवा तालुक्यातील वशी गावचे सुपुत्र होते. ते ही स्वातंत्र्यप्रेमी होते. त्यांनी वडूजच्या गोळीबार झालेल्या ऑगस्टच्या मोर्चामध्ये भाग घेतलेले स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी पुढचे आयुष्य एक उत्तम प्राथमिक शिक्षक म्हणून घालवले. साहेबलाल संदे आणि महादेव पाटील हे सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग कॉलजेमध्ये शिकण्यास आलेले दोन्ही धाडसी वीर. त्यांच्यासोबत गणीभाईही होते. आता सातारच्या सर्व बाजूने असलेला पोलिसांचा वेढा तोडायचा होता. साताऱ्यातुन बाहेर पडायचे होते. सर्व साताराभर शस्त्रधारी व निशस्त्रधारी पोलिसांची धावपळ चालू होती. गुप्त पोलीस तर साध्या वेशात फिरत होते. कोणी हॉटेलात तर कोणी दुकानात, कोणी जेलच्या जवळपासच्या घरात शिरून घरे दारे तपासत होते. सातारा हेड क्वॉर्टरचे सर्व पोलीस आसपासच्या गावी पाठविले जात असल्याचे दिसत होते. एकच गडबड ,एकच धावपळ.प्रत्येक सी.आय.डी.पोलिसांच्या हातात नागनाथ अण्णांचा फोटो दिला होता. सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. अण्णांनी नियोजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा या वाळव्याच्या छाव्याजवळ होता. गावाकडच्या दिशेने न बाहेर पडता सातारच्या पश्चिम दिशेने सहयाद्रीच्या डोंगर कपारयातुन बाहेर पडायचे ठरवले. ज्या दिशेला जाण्याचे काही कारण नाही, वाहतूक नाही, तीच दिशा अण्णांनी निवडली. त्या दिशेला पोलिसांचा बंदोबस्तही कमी होता. रात्री दहा वाजता नागनाथ अण्णा, साहेबलाल संदे व महादेव पाटील यांनी पोटभर जेवण केले. नागनाथ अण्णांना साहेबाचा ड्रेस घातला. रयतच्या व्हॉलंटरी शाळा तपासण्याचा अधिकारी अण्णांना तयार केला. साताऱ्यातील शाहू बोर्डिंगच्या धननीच्या बागेच्या पश्चिम दिशेला तिघेजण चालायला लागले. रात्री साडे अकरा बारा वाजले असतील. नाक्यावर पोलीस पहारा होताच. तेथे जवळ टेकडी होती. एका एकाने चकवा देत पहारा होता त्या ठिकाणाहून पुढे गेले. टेकडीच्या पायथ्याला गेले. पहारा पार करताना जमिनीवर पालथे पडून कोपर व गुडग्याचा वापर करून वापर करून पोलिसाच्या पहाऱ्यातुन निसटले. ते मेढ्याच्या रस्त्याने चालू लागले. सात आठ मैल चालून झाल्यावर काळोशी गावाकडे जाणारा फाटा आला. रस्ता पायवाटेचा. जंगलातून जाणारा. झाडाझुडपाच्या किर्र झाडीतून जाणारा. डोंगर कपारीचा होता. त्या रस्त्याला पोलिसांचा धोका नव्हता. दोन्ही बाजूला उंच उंच गवत वाढलेले. मध्ये पाऊल वाटेने तिघे चालत होते, साप, विंचू, काट्या पेक्षा जंगली प्राण्यांची भीती जास्त होती. मोकळ्या मैदानातून चालताना चांदण्याचा उपयोग व्हायचा. दाट जंगलातून चालताना बॅटरीचा उपयोग करावा लागायचा. थोडे अंतर गेल्यावर नदीचा पाणवटा आला. डोंगराळ प्रदेशातून वाहणारी वेण्णामाई पाण्याची ओढ. नागनाथ अण्णांनी कपडे काढली. चप्पल काढली डोक्यावर कपडे, चप्पल सहित बांधले. साहेबलाल व महादेव यांनीही कपडे डोक्याला बांधले. जसे जेल फोडणे अवघड तसे वेण्णामाई पार करणे अवघड. डोंगराळ भागात नदीच्या पाण्याला ओढ जास्त. साहेबलाल व महादेव यांनीही धाडसाने नदीत उड्या टाकल्या. तिघेही दुसरया तीराला पोहोचले. काळोशी गावचा रस्ता धरला. काळोशीत नागनाथ अण्णांचे मित्र बोगर गुरुजी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हॉलंटरी शाळेत शिक्षकाचे काम करीत होते. ते वाळवे तालुक्यातील येलूर गावचे होते. अण्णांनी गुरुजींना हाक मारून उठवले. बोगर गुरुजींना नागनाथ अण्णांनी जेल फोडल्याची बातमी दुपारी समजली होती. पोलीस पाटलाकडे मामलेदार आले होते. त्यावेळी गुरुजी घरीच होते. पहाटेच्या कोंबड्यानी बांग दिली. गुरुजींनी चहा प्यायला दिला. पहाटे पाचच्या दरम्यान नागनाथ अण्णा, महादेव पाटील, साहेबलाल संदे तिघेही एकीव गावच्या मार्गाला लागले. भगवान पाटील यांचे एकीव गावात फार वजन. सर्व व्यवहार त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालत. गावात एखादा सरकारी अधिकारी आला तर प्रथम भेट त्यांची प्राथमिक शिक्षकाबरोबर होत होती. नागनाथ अण्णांना रयतचे इन्स्पेक्टर बनवून, शाळा तपासणी भगवान पाटलांनी चालू केली होती. विद्यार्थ्यांना शाळा तपासणारे साहेब , सुपरवायझर अशी अण्णांची ओळख करून दिलेली. एकीव गावातल्या बाया बापड्या, शेतकरी सुध्दा अण्णा समोरून आले की त्यांना साहेब म्हणून नमस्कार करीत. भगवान पाटील गुरुजी, धन्वंतरी वैद्य, नागनाथ अण्णा तिघेही रयतच्या शाळा तपासण्याचा बहाणा करत कासच्या डोंगरावरून निघून पाली मार्गे सज्जनगडाच्या पायथ्या जवळून इंदोलीचे क्रांतिकारक दिनकरराव निकम यांच्याकडे गेले. पुढे रात्रभर चालून पाटण खोऱ्यात डोंगर ओलांडून कोयनेच्या खोऱ्यातील तांबवे गावी पोहचले. सुपने तांबवे येथे भूमिगत कार्यकर्ते डी.जी.पाटील यांच्या मळ्यात येऊन थांबले. यशवंतराव चव्हाणांना नागनाथ अण्णांनी सातारचा जेल फोडल्याची बातमी कळली होतीच. तेथे यशवंतराव चव्हाण नागनाथ अण्णांना भेटण्यास आले. तेथे अनेक भूमिगत कार्यकर्ते जमले होते. सर्वांनी अण्णांचे अभिनंदन केले. नागनाथ अण्णा सातारा जेल फोडून ऐतवड्यात पोहचले. घराकडे जाण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. गावाजवळील धोंडी अहिरांच्या विहिरीवरील एका झाडाखाली थांबून आई, वडिलांना बोलावून घेतले. त्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांना बोलावून भेट घेतली. त्यांना भेटून शिराळा पेट्यातून थोडे दिवस मुंबई गाठली. कर्मवीर अण्णांच्या साथीदारानी सर्व वृत्तांत कर्मवीराना सांगितला होता. नागनाथ नायकवडी या क्रांतिवीराला शाब्बासकी देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील मुंबईला आले. नागनाथ अण्णांनी कर्मवीरांच्या पायाचे दर्शन घेतले. कर्मवीर अण्णां नागनाथला मिठीत घेऊन म्हणाले, “ शाब्बास ...! क्रांतिवीरा शाब्बास...! वाळव्याच्या मातीत इंग्रज सत्तेला नतमस्तक केलं. आपल्या देशाचे नाव इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये नोंदवलस. वाळव्याच्या मातीत किती धाडस आहे हे सातासमुद्रा पलीकडच्या इंग्रजांना दाखवलस. तुझ्या स्वातंत्र्याच्या चळवळीस असेच यश लाभो. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.” क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांना क्रांतिकारक अभिवादन ( वैभवकाका नायकवडी यांच्या सौजन्याने ) - विजय मांडके , सातारा
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |