03:43am | Apr 09, 2018 |
सातारा : देशात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपच्या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आज देशामध्ये गरीब जनतेला खाण्यासाठी अन्न नाही. अशावेळी मोदी म्हणतात, देश में साडे छे लाख शौचालय बनाऊंगा । अहो, खायलाच नाही तर जाणार कोठे? असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी, धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाची फसवणूक करणार्या खोटारड्या सरकारला सत्तेवरुन पायउतार करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. दरम्यान, सातार्याला आल्यानंतर भेट म्हणून तलवार मिळेल, अशी संकल्पना होती. प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांनी याठिकाणी आमच्या हातात आसुड दिला. या आसुडाने आता आम्ही सरकारला फोकळून काढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल या चौथ्या टप्प्यातील आंदोलनात सातारा येथील गांधी मैदानावर सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आ. अजित पवार, आ. जयंत पाटील, संग्राम कोते-पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. दीपक चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. वनिता गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल माने, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
धनंजय मुंंडे म्हणाले, 2014 साली या देशात एक परिवर्तनाचे वातावरण सुरु झाले. दिल्ली येथील रामलिला मैदानावर अण्णा हजारे यांनी लोकपाल बिलासाठी देशव्यापी आंदोलन केले. या आंदोलनाला प्रचंड दाद मिळाली. याचा पूर्ण फायदा भाजपने घेतला. गुजरातचे मॉडेल देशापुढे ठेवले, गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान म्हणून घोषित केले. देशभर नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या. त्या सभेमध्ये अच्छे दिन आयेंगे, असे सांगत असत. प्रत्यक्षात मात्र गेल्या साडेतीन वर्षात वाताहत झाल्याचे दिसून येते. साठ रुपयांची डाळ शंभर रुपये झाली, पन्नास रुपयांचे पेट्रोल ऐंशी रुपये झाले, चारशे रुपयांच्या सिलेंडरसाठी आठशे रुपये मोजावे लागतात. आज गरीबाला डाळ खायला मिळेना. अशावेळी मोदी म्हणतात, छे करोड शौचालय बनायेंगे। प्रत्येक सभेमध्ये रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र देशात-राज्यात त्यांना एकही उद्योग आणता आला नाही. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आमच्या हातात द्या, तुमचा सातबारा कोरा करतो, तुम्हाला कर्जमाफी देतो, असे सांगत शेतकर्यांना भुलवले. प्रत्यक्षात मात्र शेतकर्याला कर्जमाफी करण्यासाठी राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरावे लागले. राष्ट्रवादीसमोर हतबल झालेल्या सरकारने दीड लाखांची कर्जमाफी देत असल्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र या कर्जमाफीसाठी निकष अत्यंत कडक केले. ऑनलाईन फॉर्म भरण्याचा फंडा अंमलात आणला. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात. तुमच्यापैकी कितीजणांना कर्जमाफी मिळाली? हे सरकार फसवे आणि खोटारडे आहे.
साडेतीन वर्षाच्या काळात भाजपच्या सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचार मी पुराव्यानिशी बाहेर काढले. आमच्या भगिनीने चिक्कीमध्ये, विनोद तावडे यांनी महापुरुषांच्या प्रतिमांत, आरोग्य मंत्र्यांनी औषधात, तर गृहनिर्माण मंत्र्यांनी म्हाडाच्या प्लॉटमध्ये 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. मुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिले. त्यांनी मात्र या भ्रष्टाचारी मंत्र्यांना क्लीनचिट दिली.
बहोत हो गयी महंगाई की मार, अबकी बार... बस करो यार, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे सांगून मुंडे पुढे म्हणाले, येणार्या काळात भाजपवाले सोशल मिडियाच्या माध्यमातून गप्पा मारतील. त्याला भुलू नका. मोदी -फडणवीस टीव्हीवर आले तर ते सर्व काल्पनिक आहे, असे समजून विसरुन जा. मुंबई येथे झालेल्या भाजपच्या स्थापना दिवस कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर काही वक्तव्ये केली. त्याचे दाखले देत धनंजय मुंडे म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही जेव्हा चोचरे बोलत होता, शुभंकरोती म्हणत होता, त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे पाचवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. हे विसरु नका. मुंबईत भाजप नेते या मेळाव्यात विकासावर बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र जळीस्थळी त्यांना राष्ट्रवादीच दिसते. राष्ट्रवादीला टार्गेट करणे, हा एकमेव अजेंडा भाजपचा असल्याचे स्पष्ट करुन हल्लाबोल आंदोलनानिमित्त आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय. या आंदोलनाचा भाजपने धसका घेतला असल्याचे स्पष्ट करीत फसव्या आणि खोटारड्या सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी जनतेने आम्हाला साथ द्यावी, असे भावनिक आवाहनही मुंडे यांनी केले.
सुनिल तटकरे म्हणाले, आज सायंकाळी सभा असतानाच दुपारी सातार्यात पाऊस झाला. सभा होतेय की नाही, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नियतीच्या मनातही हिशोब चुकता करण्याचा निश्चय होता. त्यामुळे या सभेला हजारोंचा जनसमुदाय लोटला. सातारा हा महाराष्ट्राला उभारी देणारा जिल्हा आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीला या जिल्ह्याने दिलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात स्व.यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांची लाट कायम असल्याचे स्पष्ट होते. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी कर्जमाफी दिली. आपल्या कार्यकाळात जगामध्ये भारत हा अन्नधान्य तयार करणारा तिसरा देश ठरला. आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज तुरडाळ आयात करावी लागत आहे. का निर्माण झाली ही परिस्थिती? भाजपच्या फसव्या घोषणांनी आज सर्वचजण होरपळत आहेत. 71 लाख कोटी कर्जमाफी देण्यासाठी फडणवीस सरकारने ऑनलाईनचा फंडा काढला. बळीराजाला रांगेत उभे केले. ज्या भाजपाने ऑनलाईनची ही परिस्थिती निर्माण केली, त्याला ऑफलाईन केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून मी पाच वर्षे काम केले. मात्र आज सातारकरांनी जो प्रतिसाद दिला, प्रेम दिले, ते प्रेम तेव्हा मिळाले नाही. याची आठवण करुन देत ते पुढे म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेव्हा पक्षाची स्थापना केली, तेव्हा आपल्याला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी पुढे जायचे आहे, असे सांगितले होते. राष्ट्रवादी सत्तेत असताना सातारा जिल्ह्यातील महु-हातगेघर, उरमोडी, कास ला भरभरुन मदत केली. सातार्याच्या दौर्यावर असताना स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी मला उरमोडीवर घेवून जात तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या. उरमोडीमध्ये विस्थापित होणार्या शेतकर्यांसाठी काहीतरी मदत करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी मी पुढाकार घेवून साडेसहा कोटींची मदत केली होती, अशी आठवण त्यांनी करुन दिली. अहमदाबादचे महत्त्व वाढविण्यासाठी मुंबई ते अहमदाबाद 64 हजार 900 कोटी रुपये खर्च करुन बुलेट ट्रेन सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. या बुलेट ट्रेनमधून आमचा शेतकरी प्रवास करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत नरेंद्र मोदींनी हाच निधी महाराष्ट्राच्या विकासकामांसाठी दिला असता तर चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासकामे झाली असती. देशामध्ये नंबर एक बँक म्हणून जिल्हा बँकेला ओळखले जाते. या बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मुलांना नोकरीची संधी देण्यात आली. मात्र भाजप सरकारने या नोकरभरतीला स्थगिती दिली. तुम्ही रोजगार देत नाही, आम्हालाही देवू देत नाही. हा कसला कारभार, असा प्रश्न उपस्थित करीत कारखानदारीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जात नाही. आज राज्यामध्ये साखरेचे साठे मोठ्या प्रमाणावर पडून आहेत. राज्यामध्ये पोलिसांकडून अमानुष घटना घडत आहेत, याकडे लक्ष वेधत आता तर जातीधर्मामध्ये तेढ वाढविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. कोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणतात, स्वीस बँकेतील काळे पैसे भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा करु. सत्ता प्राप्त झाल्यानंतर मात्र एका दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. बारा हजार कोटी घेवून निरव मोदी पळाला, ललित मोदीनेही नऊ कोटींना गंडा घातला, विजय मल्ल्यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले. या देशात मोठ्यांच्या चोर्या पचल्या जातात, असे स्पष्ट करुन राज्यामध्ये वेळोवेळी देवेंद्र सरकारने आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचा घोटाळा त्यांना बाहेर काढता आलेला नाही, असे सांगून आ. शिवेंद्रराजे भोसले आता आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी आतापर्यंत अधिक समजुतदारपणा दाखवला. शिवेंद्रराजे, आता दाढी काढू नका. जे आडवे येतील, त्यांना सोडू नका असा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला.
चित्रा वाघ म्हणाल्या, सरकारच्या कारभाराविरोधात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे हे हल्लाबोल आंदोलन आहे. शासनाने दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात हे आंदोलन आहे. देशात, राज्यात महागाईचे काहुर उठले आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रतिदिन बारा महिलांवर अत्याचार, तर तीस ते चाळीस मुलींची छेडछाड होत आहे. कोठे आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री? कोपर्डी येथील घटनेत चार्जशीट फाईल करण्यासाठी सुप्रियाताई सुळे यांना पुढाकार घ्यावा लागला. या शासनाला गाईंची काळजी आहे, मात्र बाईची नाही, असे सांगत एकवेळ पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, येथे कोणाला वाटत असेल मीच मालक आहे. तर तसे आम्ही होवू देणार नाही. राष्ट्रवादीच्या तरुणाईने रॅलीद्वारे आपली ताकद दाखवून दिली आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या विचारांना मानणारे आम्ही आहोत, हे तरुण कार्यकर्त्यांनी आज आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. केंद्र आणि राज्यामध्ये जे वेगवेगळे निर्णय घेतले जातात, त्या विरोधात या व्यासपीठावर आज पाढा वाचला जाणार आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शरद पवार यांचा वारसा घेवून या सरकारला घरी पाठविण्याचा निर्णय आज आपल्याला घ्यायचा आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |