सातारा : गेल्या महिन्यापासून सातारा शहरातील पोवई नाका चांगलाच चर्चेत आला आहे. मग ते उदयनराजेंचे भित्तीचित्र असो, की प्रस्तावित लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड असो. यामुळे सातारा शहरच काय, जिल्ह्याचे वातावरण तापलेले आहे. पोवई नाका की शिवतीर्थ? हा जुना वाद असला तरी आयलँडच्या निमित्ताने त्याला तडका मिळत आहे. परंतू या वादामध्ये सातार्यातील मावळत्या आणि विद्यमान जिल्हाधिकार्यांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची राज्य शासनाने केलेल्या तडकाफडकी बदलीमुळे अनेकांचे धाबे दणाणले. परंतू जयवंशी यांची बदली का झाली, याबाबतही अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. चला तर जाणून घेवू त्यांच्या बदलीची मीमांसा...
22 जुलै 2022 रोजी रुचेश जयवंशी हे सातारा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या कोरोना काळातील तगड्या कामामुळे त्यांनी राज्याचे लक्ष वेधले होते. सव्वा दोन वर्षाच्या कालावधीनंतर शासनाने त्यांची बदली केली. त्यांच्या जागेवर जयवंशी आले. निश्चितपणे शेखरसिंह यांनी केलेल्या कामांच्या आव्हानांचा डोंगर जयवंशी यांना चढायचा होता. खरेतर जयवंशी हे भारतीय प्रशासन सेवेतील 2008 सालच्या बॅचचे अधिकारी. निश्चितपणे त्यांच्या गाठीशी तगडा अनुभव होता. महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा पलटी झाल्यानंतर जिल्ह्याचे सुपूत्र असणारे एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आपसुकच सातारा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जावू लागला.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काम करणे हे अधिकार्यांसाठी सुळावरची पोळी असते. परंतू असे असूनही सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काम करुन आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवत ठेवला होता. पण, मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी त्याला अपवाद ठरले. त्यांना जिल्ह्याची सेवा दीर्घकाळ करता आली नाही. पाठीमागे एकदा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 11 नोव्हेंबर 2010 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजी कडू-पाटील यांचीही अशीच तडकाफडकी बदली करण्यात आली होती. परंतू संभाजी कडू-पाटील हे कर्तृत्ववान अधिकारी होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून राज्यात आपली वेगळी छाप सोडलेली होती. असो, पण तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या तडकाफडकी बदलीमुळे मात्र अनेकांनी कान उभे केलेत. जयवंशींची बदली कशी काय झाली? असा प्रश्नही राजकीय, सामाजिक धुरिणांसह अबालवृद्धांनाही पडलेला आहे.
तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे ‘असंगाशी संग, प्राणाशी गाठ’, याप्रमाणे रुचेश जयवंशींनाही असंगाशी संग नडलेला आहे. रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गावाने ओवाळून टाकलेले अनेक हवशे, गवशे, नवशे त्यांना चिकटले. यामध्ये कूप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते (माहिती अधिकार), पूर्वाश्रमीचे कुख्यात गुंड, फळकूट पत्रकार आणि कोर्टासमोर कधीही न उभे राहिलेले वकील, अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला होता. जिल्ह्यात कुठे अनाधिकृत बांधकाम आहे, कुठे-कुठे अनाधिकृत भानगडी सुरु आहेत, याचा सर्व लेखाजोखा जिल्हाधिकार्यांना देण्याचे काम हे टोळकं करीत होते. यांना सकाळ-सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पाहिल्यानंतर अनेक कर्तव्यदक्ष अधिकार्यांनाही शिसारी यायची. ज्यांची लायकी जिल्हाधिकार्यांच्या शिपायापाशी उभे राहण्याची नव्हती, तेच जिल्हाधिकार्यांच्या मांडीला मांडी लावून मिटक्या मारीत जिल्हाधिकार्यांबरोबर सरकारी चहा पिऊ लागल्याने जिल्ह्यात खरंच कायदा व सुव्यवस्थेचं राज्य उरलंय का? असा प्रश्न अनेकांना पडत होता. परंतू झोपलेल्याला उठवता येते. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठवणार कोण? तर अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार सुरु होता.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी एन यांनी एनए तसेच बांधकाम परवानगीचे अधिकार अपर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदारांना दिले होते. हाच कित्ता पुढे अश्विन मुद्गल तसेच शेखरसिंह यांनीही गिरवला होता. त्यामुळे खालील अधिकार्यांना विशेष अधिकार प्राप्त झाले होते. सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या किचकट आहे. म्हसवडमध्ये राहणार्या माणसाला सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येण्याकरीता दोन ते सव्वादोन तासांचा वेळ लागतो. तीच परिस्थिती माण, खटाव, फलटण, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांची आहे. दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याने अनेकांना शासकीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेत पोहोचणे जिकिरीचे आहे. असे असताना अपर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसिलदारांकडे काही गावांची बांधकाम परवानगी, बिनशेती व त्यासंबंधीचे अधिकार त्या-त्या तालुक्यातील अधिकार्यांना दिल्यामुळे लोकांच्या विविध परवान्यांचे काम सुलभ झाले होते. परंतू असे असताना रामास्वामी एन यांनी प्रदान केलेले अधिकार रुचेश जयवंशी यांनी एकाच झटक्यात काढून घेवून लोकांचे काम असह्य केले होते. आता या भानगडी त्यांनी का व कशासाठी केल्या, हे जिल्ह्यातील शेंबडे पोरगंही सांगू शकेल. जयवंशींनी हा फतवा काढल्यानंतर काही लोकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात एकछत्री अंमल सुरु झाला. पूर्वी बिगरशेती (एनए) हे काही हजारांमध्ये (टेबलाखालून) होणार्या कामाचा रेट लाखोंमध्ये पोहोचला. जिल्हाधिकारी कार्यालयात पोत्याने पैसा येवू लागला. अडला हरी, गाढवाचे पाय धरी याप्रमाणे अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील हस्तकांचे अक्षरश: पाय धरले. लाखांचे दोन लाख घ्या, पण काम करा... अशा आर्जवे आणि विनवण्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय गजबजू लागले. एकूणच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाची गरिमा ढासळू लागली.
जे. एन. रोज हे पारतंत्र्यातील सातारा जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी. 1854 ते 1860 दरम्यान त्यांनी सातार्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज पाहिले. तो काळ ब्रिटीश राजवटीचा असला तरी त्या काळातही त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. ब्रिटीश हे चंगळवादी होते, छळवादी होते. परंतू जे. एन. रोज यांनी त्याकाळी केलेल्या कामांमुळे ते सातारी जनतेच्या गळ्यातील ताईत झाले होते. तेव्हापासूनच सातारच्या जिल्हाधिकारी पदाला एक गरिमा-प्रतिष्ठा आणि अखंडता प्राप्त झाली होती. ज्या-ज्या जिल्हाधिकार्यांनी सातारा जिल्हाधिकारी म्हणून काम केले, त्यांनी पुढे जावून आपल्या कार्यकाळामध्ये लोकाभिमुख राहील असेच काम केले. परंतू यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेल्या हीच डिग्निटी मातीमोल केली. महसुली डायनने केलेली घाण शेखरसिंहांना साफ करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. शेखरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या लौकिकाला साजेसे काम करण्याची जबाबदारी जयवंशींवर आली. मात्र, नेमके झाले उलटेच. जी घाण महसुली डायनने करुन ठेवली होती, तीच घाण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात व्हायला सुरुवात झाली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा राजकीय एजंट, आरटीआय कार्यकर्ते आणि फळकूट पत्रकारांनी घेतला.
महाबळेश्वर-पाचगणी, कास येथील अतिक्रमणांवर हातोडा पडणार असा फतवा निघाला. नोटीसी रवाना झाल्या, पण कारवाई शुन्य. गोरगरीबांच्या, हातावर पोटे असणार्यांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवले पण धनदांडग्यांना अभय मिळाले. थातुरमातुर कारवायांमुळे दहशत निर्माण झाली. परिणामी लाखो-कोट्यवधींमध्ये तडजोडी झाल्या. आता हे पैसे कोणाला मिळाले, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
मध्यंतरी सातार्यातील वकिलांनी जिल्हा न्यायालयातील दोन न्यायाधीशांसमोर कामकाज न चालविण्याचा निर्णय घेतला होता. या दोन न्यायाधीशांचा आणि सातारच्या तत्कालीन जिल्हाधिकार्यांचा नक्की संबंध तो काय? यावरही मोठ्या खुमासदार चर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झडत होत्या. आता या चर्चा काय? सातारा न्यायालयातील त्या न्यायाधीशांचे आणि तत्कालीन जिल्हाधिकार्यांचे नक्की काय संबंध होते, याचाही शोध चिकित्सक नागरिकांनी घ्यावा, अशीही मागणी जोर धरु लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाबळेश्वर तसेच जिल्ह्यातील इतर प्रलंबित प्रकल्पांना गती मिळाली. मोठमोठे पर्यटन विकास आराखडे मंजूर होवू लागले. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, त्यातही त्यांचे मूळगाव महाबळेश्वर तालुक्यातील. त्यामुळे हे प्रकल्प राबविताना त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. टक्केवारीची प्रकरणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली. जिल्ह्यातील आमदार-खासदारांनीही मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्र्यांकडे तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या तक्रारी केल्या. त्यामुळे गुड बुक मध्ये असलेले जयवंशी बॅड बुक मध्ये गेले. अधिकार्यांचे अधिकार काढून घेतल्याने त्यांना आता जिल्ह्यात काम करण्यास स्वारस्य उरले नव्हते. तलाठ्यापासून सर्कल ते नायब तहसिलदारांच्या बदल्यांमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील महसुली विभागात प्रक्षुब्धतेचे वातावरण तयार झाले होते. ढोबळ मानाने ही आणि अशी कारणे तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या बदलीच्या माध्यमातून पुढे येत आहेत. असे असताना फळकूट लोकांची संगत ही तत्कालीन जिल्हाधिकार्यांना नडली आहे.
तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे,
असंगाशी संग, प्राणाशी गाठ
दुर्जनांची गंधी, विष्ठेचिया परि
देखोनिया दुरी व्हावे तया...!
पदभार सोडूनही जिल्हाधिकारी?
सुमारे आठ दिवसांपूर्वी म्हणजेच 7 जून रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली झाली. सध्या ते प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची बदली झालेली आहे. बदलीचे आदेश निर्गमित झाल्यानंतर डुडी यांनी तत्काळ सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता, तर जयवंशी यांना हँगिंग ठेवल्याने सध्या ते सातारा येथील जिल्हाधिकार्यांच्या शासकीय निवासस्थानीच रहावयास आहेत. त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पाटी मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण सातारा जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डुडी येवूनही जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानावर अजूनही जयवंशीच जिल्हाधिकारी असल्याची पाटी झळकत असल्याने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नक्की कोण डुडी, की जयवंशी असा प्रश्न याठिकाणाहून जाणार्या-येणार्यांना पडलेला आहे.
महसुली डायनचा वसा, गरम होत होता चिरकुटांचा खिसा.
सखी संय्या तु खुबही कमात है, महसुली डायन खाये जात हैं, असे म्हणत सातारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी असणार्या महसुली डायनने आख्खा सातारा जिल्हा धुवून खाल्ला होता. ‘सातारा टुडे’ने दे माय धरणी ठाय असे म्हणत महसुली डायनला सळो की पळो करुन सोडले होते. तिने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यामुळे तिचे महसुली वर्तुळच नव्हेतर राज्यात छि:थू झाली होती. महसुली डायनने केलेली घाण तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंहांना साफ करावी लागली होती. शेखरसिंगांनी केलेल्या झाडाझडतीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय चांगलेच सरळ झाले होते. परंतू गेल्या वर्षभरात तथाकथित आरटीआय कार्यकर्ते, फळकूट पत्रकारांनी व गुंडापुंडांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाला लायझनिंग नावाची वाळवी लावलेली होती. महसुली डायनने दिलेला वसा या फळकुटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरेपूर चालवला. परंतू या चिरकुटांना जिल्हाधिकारी कार्यालयच काय, पण परिसरातही फिरकू न देण्याचा विडा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उचलला तरच गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालयाची धुळीस मिळालेली 'गरिमा' पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे.
- संग्राम निकाळजे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |