10:08pm | Aug 04, 2021 |
सातारा : पुणे शहर पोलीस दलातील महिला उपायुक्तांच्या साजुक तुपातील बिर्याणी कांडामुळे राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. असे असतानाच काल दि. 3 रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांच्या बदल्यांचा बार उडाला. पण हा बार सहन न झालेल्या एका पोलीस शिपायाने चक्क आत्महत्येची धमकी देत सातारा पोलीस दलालाच वेठीस धरले. त्यामुळे काही काळ का होईना, सातारा पोलीस दल बॅकफूटवर आले. परंतू हे जरी वरवरचे असले तरी कालच्या बदल्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील दोन नंबरवाल्यांसह राजकीय पुढारीही भलतेच सक्रीय झाले होते.
पोलिसांना शिस्त असेल तर संपूर्ण समाजाला शिस्त लागते, असे म्हटले जाते. कारण कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. पोलीस दलाचा जनतेशी थेट संबंध येत असतो. त्यामुळेच ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्य पोलिसांनी अंगिकारले आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यातील पोलीस दलाची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. अनेक पोलीस अधिकारी काही महत्त्वाचे बोलायचे झाल्यास व्हॉटसऍपचा आधार घेतात. असे असताना सातारा पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार कर्मचार्यांच्या बदल्यांचा बार काल उडाला. गेली अनेक वर्षे एकाच विभागात दबा धरुन बसलेल्या अनेकांच्या विट्ट्या गुल झाल्या. अनेक बहाद्दर गेली पंधरा-पंधरा वर्षे सातारा शहरातच वरिष्ठांना गुंगारा देवून जिवाचा सातारा करीत होते. अशांची हद्दपारी केल्यामुळे ते दुखावले.
सातारा जिल्ह्याचे 10 हजार 484 कि.मी. वर्ग क्षेत्रफळ आहे. म्हणजेच सातारा शहर मुख्यालयापासून म्हसवड शहर 86.7 कि.मी., कराड 51 कि.मी., फलटण 60 कि.मी., पाटण 61 कि.मी., वाई 36 कि.मी. ही शहरे एक ते दीड तासांच्या अंतरावरील आहेत. म्हणजेच सातारा शहराची भौगोलिक परिस्थिती पोलिसांसाठी सुकर म्हणावी लागेल. परंतू जेथे माल तेथे भ्रष्ट पोलिसांचा ताल यानुसार सातारा जिल्हा पोलीस दलातील अनेक भ्रष्ट पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चिकटून बसलेले आहेत. म्हसवड किंवा कोयनानगर पोलीस ठाणे सातारा जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांना अंदमानचे सेल्युलर जेल वाटते. तेथे नियुक्ती होणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच मिळाली, अशी मानसिकता अनेकांनी करुन घेतली आहे. परंतू म्हसवड किंवा कोयनानगर ही पोलीस ठाणी जर पोलीस कर्मचार्यांना काळ्या पाण्याची शिक्षा वाटत असतील तर ही पोलीस ठाणी विसर्जित करायला काय हरकत आहे?
सातारा जिल्हा हा संपूर्ण देशभरात सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो जवान देशातील विविध सिमेवर तैनात आहेत. अतीशय प्रतिकूल परिस्थिती, वातावरणात ते देशसेवा करीत आहेत. ज्याठिकाणी बदली होईल, त्याठिकाणी आनंदाने हे जवान देशाची सेवा करतात. दुसर्या महायुद्धापासून आजपावेतो देशाची सेवा करीत असताना शेकडोंनी हौतात्म्य पत्करले आहे. असे असताना दरवर्षी शेकडो युवक लष्करात भरती होतात. निमूटपणे केवळ देशासाठी आपले तारुण्य अक्षरश: ओवाळून टाकतात. मात्र पोलीस दलात उलटी परिस्थिती आहे. पोलीस दलात भरती होताच कोणते पोलीस स्टेशन मलाईदार आहे, त्या पोलीस ठाण्याच्या किंवा शाखेच्या पोस्टिंगसाठी राजकीय पुढार्यांकडून सेटींग लावले जाते. एकदा का दोन नंबरचे रक्त तोंडाला लागले की ते पाठीमागे वळून पाहत नाहीत. त्यामुळेच सातारा पोलीस दलातील काही पोलीस कर्मचार्यांमुळे सातारा पोलिसिंग झाकोळले आहे.
काल दि. 3 रोजी पोलीस कर्मचार्यांच्या बदल्यांचा खलिता बाहेर पडल्यानंतर सातारा वाहतूक शाखेत चालक असलेल्या एका कर्मचार्याने बदल्यांमध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी आता आत्महत्या करणार आहे, अशा आशयाचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्या पोलीसाचा युद्धपातळीवर शोध घेतल्यानंतर ते महाशय यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत आढळून आले. तत्काळ त्यांना सातार्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सातारा पोलीस दलातील कर्मचार्याच्या या कांडामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. परंतू यासंदर्भात खोलात जावून माहिती घेतली असता हे महाशय गेली 17 वर्षे सातारा शहरातच कार्यरत आहेत. या शाखेतून-त्या शाखेत त्यांचा प्रवास सुरु आहे. शेवटी त्यांची बदली नियमानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि त्यांना म्हसवड पोलीस ठाण्यात नियुक्ती ही काळ्या पाण्याची शिक्षा वाटली. आज या समाजामध्ये अनेकांना दोनवेळचे सोडा, पण एकवेळचा घास मिळणेही दुरापास्त झाले आहे. आई-वडील, मुले, भाऊ-बहिण त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. अडचणी सर्वांनाच असतात, परंतू त्या अडचणींवरही मात करुन आपले कर्तव्य श्रेष्ठ मानत अनेकजण नात्यागोत्यांना तिलांजली देवून आपले कर्तव्य पार पाडतात. सिमेवर जवान उण्या तापमानात जिवाची पर्वा न करता देशाच्या सिमांचे रक्षण करतात. त्यांनाही वृद्ध आई-वडील असतात, त्यांनाही मुलेबाळे असतात. परंतू घरावर तुळशीपत्र ठेवून जो पेशा पत्करलाय, त्याच्याशी ते प्रामाणिक राहतात. सातारा पोलीस दलातील आत्महत्येची धमकी देवून पोलीस दलालाच वेठीस धरणारे ते विजय माळी नावाचे महाशय मात्र या सर्वांना अपवाद ठरले. आता त्यांच्या बाजूने राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणारे त्यांचे जातबंधूही त्यांच्या बाजूने सरसावलेत. ते आता पोलिस प्रमुखांना भेटून निवेदन देणार आहेत म्हणे. राज्य पोलीस दलाला एक शिस्त आहे. त्या शिस्तीनुसार पोलीस दल मार्गक्रमण करीत आहे. देशातील विविध सरकारी आस्थापनांच्या विविध संघटना आहेत. त्या संघटनांच्या माध्यमातून सरकारी नोकरशहा आंदोलनाचे हत्यार उपसतात. परंतू देशातील विविध राज्यांच्या पोलीस दलांची एकही संघटना नाही. त्यामुळे चोवीस तास ऑन ड्युटी असलेल्या पोलीस दलाला फुटीरतेचे ग्रहण लागलेले नाही. पोलीस दलातील सो कॉल्ड महाभागांना सरकारी पगार एकतर पुरत नसावा किंवा त्यांच्या गरजा वाढल्याने भ्रष्टाचाराशिवाय त्यांना पर्याय राहिलेला नसावा.
राज्यात गुटखा बंदी आहे. परंतू तो गुटखा सर्वत्र सर्रास मिळतो. सातारा जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर बंदी आहे. परंतू रोज शेकडो ब्रास वाळू उपसली जाते. मटका-जुगार, दारु, वडाप ज्याच्या-ज्याच्यावर शासनाने बंदी घातली आहे. त्या-त्या गोष्टी जिल्ह्यात सर्रास सुरु आहेत. ज्याच्यावर बंदी त्याचा रेट अधिक. वर्षानुवर्षे कलेक्शन करणार्या अनेक पोलीस कर्मचार्यांची यामुळे चलती आहे. वरिष्ठांना सर्व माहित असते. परंतू त्याच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवली जात नसल्याने हेच पोलीस कर्मचारी पोलीस दलाचेच कर्दनकाळ बनू पाहत आहेत. सातारा पोलीस दलातील बदल्यांच्या उडालेल्या बारामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी घायाळ झाले आहेत. सातारा जिल्ह्याला यापूर्वी केएमएम प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांच्यासारखे खमके पोलीस अधीक्षक भेटल्याने पोलीस दलाच्या विरोधात 'ब्र' उच्चारण्याची कोणत्याही पोलीस कर्मचार्याची बिशाद नव्हती. परंतू गेल्या काही वर्षांमध्ये सातारा पोलीस दलाची घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. त्यातच राज्यात आलेल्या तीन तिघाडी सरकारमुळे नक्की कोणाची हौस भागवू, अशी पोलीस दलाची अवस्था झाली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, त्यामुळे निर्णय घेताना वरिष्ठ पोलीस अधिकारीही गांगरुन गेले आहेत. काल बदल्यांच्या संदर्भात घडलेला प्रकारही याचेच द्योतक मानावे लागेल. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना जिल्हा पोलीस दलाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी लागणार आहे. शांत स्वभावाच्या एसपींना आपला करारी बाणा दाखवावाच लागणार आहे. नाहीतर लाव रे तो व्हिडिओ, असे म्हणत अनेक भ्रष्ट कर्मचारी पोलीस दलाला वेठीस धरणारच !
पोलीस कर्मचार्याकडून वरिष्ठ अधिकार्यांचे ब्लॅकमेलिंग ?
पुण्यातील बिर्याणी प्रकरणानंतर अनेक भ्रष्ट कर्मचार्यांना भलताच 'कंड' चढलेला आहे. वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांशी अनेक संवेदनशील विषयांवर मनमोकळेपणाने बोलत असतात. त्याचा गैरफायदा घेवून हे कर्मचारी वरिष्ठांचे फोन रेकॉर्ड करतात. जोपर्यंत गुळंबा, तोपर्यंत सर्वकाही ठीक. परंतू अडचणीत आल्यानंतर हेच कर्मचारी वरिष्ठांना अनेक संवेदनशील विषयांचे रेकॉर्डिंग ऐकवून ब्लॅकमेल करतात. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये उचलबांगडी झालेल्या एका कर्मचार्याने फलटणमधील एका राजकीय पुढार्याशी व मटका बुकी व वाळू माफियांशी संधान साधून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण सातारा पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून या ब्लॅकमेलिंग रॅकेटशी संबंधित असणार्या राजकीय पुढार्यांसह अनेकांचे सीडीआर पोलिसांकडून खंगाळले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांना चॅलेंज करणार्या या रॅकेटचे मात्र धाबे दणाणले आहेत.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |