कोरोनाच्या संसर्गामुळे अखंड जग जागच्या जागी थिजलेले आहे. त्यात भारत देशाची अवस्था अधिक बिकट होत चालली आहे. ज्या घटनेच्या आधारावर हा अखंड देश उभा राहिलेला आहे, त्या विटाच आता डळमळू लागल्या आहेत. अव्यवस्थेला चोख प्रत्युत्तर देणे, हे या देशात जन्मलेल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतू ते कर्तव्यच हल्ली प्रत्येकजण विसरत चाललेला आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. त्याची मिमांसा होणे गरजेचे आहे.
कालपासून समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याला कायद्याचे रक्षक समजले जाणारे पोलीस लाठ्या-काठ्यांनी अक्षरश: झोडपून काढीत आहेत. शेवटी काठ्यांनीही कंटाळून आपल्या माना टाकल्या, पण मारणारे हात मात्र दमले नाहीत, ते चालतच राहिले. लाठ्या-काठ्यांनी कोणाचेही भले झाले नाही. छोट्या शाम ला आईने काठीने मारल्यानंतर तीच आई रात्री उशिरा पाठीवर उठलेल्या व्रणांवर तेल लावून त्यावर प्रेमाची फुंकर घालते. शेवटी आई ती आईच असते. आईची माया मुलालाच कळते. कारण नऊ महिने, नऊ दिवस तिने हा अमूल्य ठेवा आपल्या पोटात जपलेला असतो. मग ती आई साने गुरुजींची असो, की तुमची-आमची. कदाचित दुसर्यावरती काठी चालविताना ही माया आड येत नाही. मग त्या काठीच्या चिंधड्या उडाल्या तरी ती थांबत नाही. ती अमानुषपणे चालतच राहते. सुमारे दीड महिन्यापूर्वी मराठवाड्यातील जालन्यामध्ये एका रुग्णालयाची तोडफोड केल्याच्या आरोपावरुन येथील डीवायएसपी आपल्या अधिकारी व कर्मचार्यांसमवेत एका व्यक्तीला घेरुन काठीने जनावरासारखे बडवून काढीत आहे, हा व्हिडिओ कालपासून समाजमाध्यमांवर फिरत आहे. हा व्हिडिओ पाहताना काळजाचा अक्षरश: थरकाप उडतो. पोलिसांनी तपास करायचा असतो, न्यायनिवाडा नाही. न्यायनिवाडा करण्यासाठी घटनेने या देशात सक्षम न्याययंत्रणा उभारलेल्या आहेत. परंतू कायद्याची अंमलबजावणी करीत असताना याच तपास यंत्रणा कधीकधी न्याययंत्रणेसारख्या वागून स्वत:च न्यायदात्याच्या भूमिकेत जातात तेव्हा खरंच आपला देश र्हासाकडे चालला आहे की काय, असे वाटते.
जालना असो, किंवा देशातील कोणतेही गाव वा शहर असो. पोलिसांनी अनेकदा कायदा हातात घेतल्याचे सिद्ध झालेले आहे. सांगलीतील अनिकेत कोथळे या युवकाचा पोलिसांनी पोलीस ठाण्यातच निर्घृण खून केला होता. सोलापूर जिल्ह्यातील रावसाहेब जाधव खून प्रकरणी कराड पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधिकारी-कर्मचारी सध्या जेलची हवा खात आहेत. ही दोन्हीही प्रकरणे देण्या-घेण्याच्या भानगडीवरुन झाली होती. या दोन्ही घटना न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिरसिंग, पोलीस अधिकारी सचिन वाझे व त्यांनी केलेल्या कांडामुळे मुंबई पोलिसांची संपूर्ण देशभरात छि-थू झालेली आहे. पैशासाठी आम्ही शेणही खावू शकतो, हे कृतीतून या पोलीस अधिकार्यांनी दाखवून दिलेले आहे. मध्यंतरी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतून मुंबईतील काही अधिकारी कर्मचार्यांचे पगार करतो, अशी गोष्ट ऐकिवात आली होती. आता ती खरी वाटायला लागली आहे. असो, अशा घटनांमुळे दिवसेंदिवस सामान्य माणसांची पोलिसांवरील विश्वासार्हता कमी होवू लागलेली आहे. पूर्वी पोलीस चड्डीत होते. ब्रिटीशांनी पोलिसांना चड्डी का घालायला लावली? याबद्दल निश्चितपणाने योग्यवेळी लिहिले जाईलच. परंतू शंभर कोटींचे टार्गेट पूर्ण करता-करता महाराष्ट्र पोलिसांची लोकप्रियता एवढी रसातळाला जाईल, असे कधी वाटले नव्हते. पूर्वी मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जायची. परंतू खालपासून वरपर्यंत वसुलीचे टार्गेट पूर्ण करता-करता आपण आता पोलीस आहोत की नाही, याचेही भान पोलीस दलातील काही महाभागांना राहिलेले नाही.
पांडु हवालदार नावाचा दादा कोंडके यांचा चित्रपट सुमारे साडेचार दशकांपूर्वी येवून गेला. यातील चड्डीमधील सख्या-तुक्या भाव खावून गेले. कारण ते चड्डीत जरी असले, तरी ते निरागस होते. त्यामुळेच ही जोडी लोकांना प्रचंड भावली. माणसाला हाव हवी, पण ती केवळ जेवणात जेवढे मीठ लागते, तेवढीच. सद्विवेकबुद्धीला स्मरुण काम केले तरच ते चिरकाल टिकते. पूर्वी पोलीस चड्डीत असले तरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती तसेच सहानुभूतीही असायची. पांडू म्हटले तरी समोरच्याचे जुजबी अपराध पोटात घालण्याची धमक त्यांच्यात होती. परंतू हल्ली पोलिसांची गणिते अवघड झालीत. ‘मेरी जरुरते कम है, इसलिए मेरे जमीर मे दम है’ हा सिंघम चित्रपटातील डायलॉग भाव खावून गेला. तीन तासांसाठी का होईना, पोलिसांतील जमीर जागे करण्याचे काम नायकाने केले. परंतू वाझे, परमबिर व ओघानेच अनिल देशमुखांच्या कृत्यामुळे मात्र राज्यातील पोलिसिंगचं चाललंय तरी काय ?, हा प्रश्न प्रकर्षाने समोर आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात रझाकारी होती. म्हणजेच निझामाचे राज्य होते व त्याचे मुख्य ठाणे जालना होते. या जालन्यातच 'डंके की चोट पर' पोलिसांनी एका तरुणाला कोरोनासारख्या महामारीच्या काळात काठी तुटेपर्यंत मारहाण केली आहे. कालपासून ‘त्या’ अमानूष मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्या पोलिसांबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. डीवायएसपी दर्जाचा अधिकारी आपल्या अधिकारी-कर्मचार्यांना बरोबर घेवून अशाप्रकारचे कृत्य कसे करु शकतो? या एकाच विचाराने हा व्हिडिओ पाहणार्याच्या मनात एकच काहूर माजलेले आहे. पूर्वी याच परिसरात निझामाच्या पोलिसांनी लोकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करुन त्यांचे हालहाल केले होते. आमीन साब आये, असे म्हणत अनेक अबालवृद्ध घरात स्वत:ला कोंडून घेत, एवढा दरारा त्या आमीन सायबाचा असायचा. जालन्याचे डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी आम्ही रझाकारांचाच कायदा पाळतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे. केलेल्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात, हे गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच सिद्ध झाले असून ऍट्रोसिटीच्या एका प्रकरणात लाच मागितल्याप्रकरणी डिवायएसपी खिरडकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सध्या खिरडकर न्यायालयीन कोठडीत आहे. यालाच आजच्या युगात ‘इन्स्टंट कर्मा’ असे म्हटले जाते.
गेल्या आठवड्यात कर्नान नावाचा एक तमिळ चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे. समाजव्यवस्थेने झिडकारलेल्या समाजात राहून अव्यवस्थेविरोधात लढणारा कर्नान निश्चित अशावेळी आधार देतो, मनगटात लढण्याचे सामर्थ्य मिळवून देतो. डुक्कर आणि कुत्र्यांच्या सहवासात जीवन जगणार्या समाजाला याही काळामध्ये कशापद्धतीने वागवले जाते, मुलभूत सुविधा असूनही त्याचा उपभोग घेण्यासाठीही फक्त नोकरशहांच्या आडमुठेपणामुळे तो समाज कसा वंचित राहतो आणि याच नोकरशहांच्या विरोधात कर्नान, अर्थात आधुनिक कर्ण कसा उभा ठाकतो, हे बघताना धमण्यांमधील रक्त सळसळते. द्रौपदीने नाकारुनही कर्ण इतिहासात अजरामर झाला. शारीरिक क्षमता नसतानाही बापाच्या वयापेक्षा जास्त असणार्या लोकांना काठीने अमानूष मारहाण करुन त्यांची चामडी लोळवताना आसुरी आनंद व्यक्त करणार्या पोलीस अधिकार्याचा गळा तलवारीने चिरताना कर्नान कचरत नाही. कारण ही लढाई कुठल्या व्यक्तीविरोधात नसून ती प्रवृत्तीविरोधात आहे, हे कर्नान मधून दिग्दर्शकाने दाखवून दिले. जालन्याचे एक उदाहरण समोर आले. राज्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून दमन झालेल्या घटना वारंवार समोर येतात. अशावेळी कायद्याचे दमन करुन समांतर रझाकारी माजवणारे ठेचले पाहिजेत. त्यामुळेच आमीन साब, तुम्ही मारत जाणार, तर कर्नान बनतच राहणार !
- संग्राम निकाळजे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |